निसर्ग सफारी बसने सागरेश्वरमध्ये पर्यटनाला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:31 AM2021-09-07T04:31:50+5:302021-09-07T04:31:50+5:30
कडेगाव : वन्यजीव विभागाने सुरू केलेल्या जंगल सफारी बस उपक्रमामुळे सागरेश्वर अभयारण्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन सहकार व ...
कडेगाव : वन्यजीव विभागाने सुरू केलेल्या जंगल सफारी बस उपक्रमामुळे सागरेश्वर अभयारण्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात निसर्ग सफारीच्या उद्देशाने वन्यप्राण्यांच्या चित्रांनी सजवलेल्या जंगल सफारी बसचे लोकार्पण कदम यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, डॉ. जितेश कदम, विभागीय वन अधिकारी विशाल माळी, प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड यांची प्रमुख उपस्थिती होती.
विश्वजित कदम म्हणाले की, सागरेश्वर अभयारण्यातील या बसमुळे देश-विदेशातून येथे येणाऱ्या पर्यटकांची सोय होईल. त्यांना अभयारण्यातील जैवविविधता व पशुपक्षी पाहण्याची संधी मिळेल. दिवंगत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम वनमंत्री असताना अभयारण्यात पर्यटकांच्या निवास व्यवस्थेसाठी बांबू कुटी व विश्रामगृह उभे राहिले. स्वागत कमान, वन्यजीव माहिती केंद्र, अभयारण्याच्या चित्ररूप दर्शनासाठी ॲम्पी थिएटर उभारले. वन्यजिवांसाठी पाणी उपलब्ध करून दिले. बंधाऱ्यांमध्ये ताकारी योजनेचे पाणीही सोडले आहे. सागरेश्वर अभयारण्य पर्यटनासाठी उद्यापासून खुले होत आहे.
यावेळी माजी सभापती मोहनराव मोरे, शोभाताई होनमाने, सोनहिरा कारखान्याचे संचालक पोपट महिंद, देवराष्ट्रेचे सरपंच प्रकाश मोरे, मोहित्यांचे-वडगावचे सरपंच विजय मोहिते उपस्थित होते.
चौकट
पतंगराव कदम यांची संकल्पना
सागरेश्वर अभयारण्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी निसर्ग सफारी बससेवा सुरू करण्याची घोषणा माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केली होती. मी स्वतः पाठपुरावा करून जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातून बसची तरतूद केली होती. यातून १५ आसनी बस घेण्यात आली आहे. ही बस दररोज सकाळी सात वाजता व पर्यटनासाठी निघेल. एका पर्यटकाला नाममात्र ७० रुपये शुल्क असल्याचे विश्वजित कदम यांनी सांगितले.