व्हायरल आजारांनी नागरिक हैराण, मनात कोरोनाच्या भीतीचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:31 AM2021-09-07T04:31:43+5:302021-09-07T04:31:43+5:30
सांगली : पावसाळी वातावरणात अचानक ताप, सर्दी, घसादुखी, खोकला, अतिसार यासारखे आजार तोंड वर काढत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात असे ...
सांगली : पावसाळी वातावरणात अचानक ताप, सर्दी, घसादुखी, खोकला, अतिसार यासारखे आजार तोंड वर काढत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात असे रुग्ण वाढले आहेत. कोरोनाची महामारी सध्या सुरु असताना या संसर्गजन्य आजारांनी नागरिकांमधील भीती वाढत आहे. यासाठी दक्षतेच्या काही गोष्टी प्रत्येकाने कराव्यात, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
दिवसभर ढगाळ वातावरण, अधून-मधून पावसाच्या सरी, हवेतील गारवा, ओलसरपणा, दमटपणा अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे माणसाच्या शरीरावर विपरित परिणाम होत आहे. पावसाळ्यात आजार वाढतच असतात, मात्र अशावेळीही खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. या काळात थोड्याशा लक्षणानंतर काही लोक खबरदारी म्हणून कोविडची चाचणी करीत आहेत, तर अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
चौकट
कोणते आजार सतावताहेत नागरिकांना
सध्या सर्वच वयोगटातील लोकांना अचानक ताप येत आहे.
सर्दी व कफ झाल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर आहेत.
थांबून थांबून येणारा खोकला अनेकांमध्ये दिसत आहे.
घसा दुखणे किंवा घसा बसण्याची समस्याही सतावतेय.
डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत
खाण्यात कोणताही बदल नसतानाही अनेकांना अतिसार होत आहे.
चौकट
यामुळे वाढताहेत हे आजार
सध्या पावसाचे वातावरण असल्याने या काळात विषाणूंची संख्या वाढते.
सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी डासांचा उपद्रव अधिक आहे.
डासांमुळेही डेंग्यू, मलेरियासारखे आजार वाढत आहेत.
अस्वच्छ व बाहेरचे पदार्थ खाणे, शीतपेय घेणे
उबदार कपड्यांचा वापर टाळणे.
कोट
पावसाळ्यात विषाणूजन्य, जिवाणूजन्य आजार वाढत असतात. डासांमुळे सध्या डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. ताप आला तर तापाचे औषध घ्यावे, दोन दिवस ताप गेला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घराभोवती पाणी साचू न देणे, बाहेरचे अन्न, शीतपेये टाळणे इतकी दक्षता घ्यावी.
- डॉ. अनिल मडके, श्वसनविकार तज्ज्ञ, सांगली
कोट
कोविडबाबत सतर्कता बाळगताना संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठीही नागरिकांनी सतर्क रहावे. कोविड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने संसर्गजन्य आजारांवर उपचार करावेत. त्याकडे दुर्लक्ष करु नये. घराभोवती पाणी साचू न देणे, आहाराबाबत दक्षता घेणे आदी उपाय करावेत.
- डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी