रुपेश हेळवे
सोलापूर : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी रेल्वे अडवून रेल्वे रुळावर टायर जाळून तीव्र निषेध व्यक्त केला. मंगळावारी दुपारी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना रुळावरून दूर केले. त्यानंतर रेल्वे मार्गस्थ झाली.
मंगळवारी दुपारी खमितकर अपार्टमेंट परिसरात कार्यकर्त्यांनी मालवाहतूक रेल्वे गाडी अडवली. त्यानंतर घोषणाबाजी सुरू केली. शिवाय यावेळी आंदोलनकरणार्यांनी रुळावरच टायर ठेवून ते जाळण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी पोलिस दाखल झाले. त्यांनी टायर पेटवण्याच्या आतच सगळ्या टायरी बाहेर टाकत आंदोलकांना बाजूला केले. दरम्यान, काही आंदोलकांनी रेल्वेवर चढून आंदोलन सुरू केले.
दरम्यान, यावेळी मागील दिवसात १० समाज बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले आणि आजपर्यंत मराठा समाजातील ५० बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले. तरीही शासनाकडून गंभीरतेने कोणतेही पाऊल उचलण्यात येत नाही, असा आरोप करत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला.
सरकारने लवकर मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. अन्यथा येणाऱ्या काळात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सत्ताधारी आमदार, खासदार व विरोधी पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मराठ्यांच्या युवकांचा अंत पाहू नका परिणाम गंभीर होतील असे मत तरुणांनी व्यक्त केले.