Join us  

'मन झालं बाजिंद'मध्ये राया आणि कृष्णावर होणार जीवघेणा हल्ला, यातून दोघे सुखरूप वाचतील का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 2:44 PM

'मन झालं बाजिंद ' (Man Jhala Bajind) या मालिकेत घुली मावशी राया आणि कृष्णा घरापासून लांब असल्यामुळे या दोघांवर देखील जीवघेणा हल्ला करणार

 आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला आपण पाहिलाय. परंतु पहिल्यांदाच 'मन झालं बाजिंद ' (Man Jhala Bajind) या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळाली. परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा बाजिंदा राया आणि मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी कृष्णा यांच्या बाजिंद्या प्रेमाची ही गोष्ट आहे. या मालिकेने आणि त्यातील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.  

प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि अनेक अडचणींवर मात करून, प्रेमाची सत्वपरीक्षा दिल्यावर राया आणि कृष्णा एकत्र आले आहेत, पण त्यांच्या सुखात मिठाचा खडा टाकण्यासाठी घुली मावशी नेहमी सज्ज असते. सध्या राया घरापासून दूर हळदीच्या शेतात राहतोय. राया घरात राहणार नाही म्हणून कृष्णा देखील आपल्या पतीची साथ देण्यासाठी त्याच्यासोबत हळदीच्या शेतात राहायला जाते. दोघांच्याही मनात एकमेकांसाठी अफाट प्रेम असल्यामुळे ते हळदीच्या शेतातील छोट्या घरात देखील आनंदाने राहतात. भाऊसाहेबांना मात्र रायाचं असं घरापासून दूर शेतात राहण्याचा निर्णय पटत नाही आणि याच संधीचा फायदा घुली मावशी घेणार आहे. कृष्णाचा काटा काढण्यासाठी घुली मावशीने असंख्य प्रयत्न केले पण राया कृष्णासोबत असल्यामुळे ते नेहमी असफल ठरले. पण आता घुली मावशी राया आणि कृष्णा घरापासून लांब असल्यामुळे या दोघांवर देखील जीवघेणा हल्ला करणार आहे. यातून राया आणि कृष्णा सुखरूप वाचतील का? राया आणि कृष्णाचं प्रेम या अडचणीवर देखील मात करेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.     

टॅग्स :झी मराठीसेलिब्रिटी