अरुणाचल प्रदेश ते गुजरात पदयात्रा
By Admin | Published: March 3, 2016 02:08 AM2016-03-03T02:08:11+5:302016-03-03T02:08:11+5:30
येथील एमआयडीसी भागात राहणारे विद्याधर भुस्कुटे (६४) यांना चालण्याची सवय-छंद आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी हे ४००० किमीचे अंतर
डोंबिवली : येथील एमआयडीसी भागात राहणारे विद्याधर भुस्कुटे (६४) यांना चालण्याची सवय-छंद आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी हे ४००० किमीचे अंतर पायी चालून चार महिन्यांत पूर्ण केले होते. त्यानंतर, आता त्यांनी आॅक्टोबर २०१५ मध्ये किबीठू-अरुणाचल प्रदेश ते गुजरात हे ४ हजार किमीचे अंतर पायी चालण्यास सुरुवात केली. २६ फेब्रुवारीला ते पोरबंदर येथे पोहोचले. त्यानंतर, रविवारी ते डोंबिवलीत आले. शहरात येण्यापूर्वी कल्याण- शीळ रोड येथे नागरिकांनी त्यांचा सत्कार केला.
जीपमधून त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढली. त्यांच्या या विशेष कार्याची दखल घेऊन सोमवारी पालिकेच्या सभागृहातही त्यांचा सत्कार करण्यात आला. दक्षिणोत्तर, पूर्वपश्चिम असे भारतात पदभ्रमण करताना त्यांना अनेक राज्यांतून जावे लागले. पदभ्रमणासोबत वाटेतील संस्था, नागरिक, शाळा आदींमध्ये शांतता, बालमजुरी, स्त्रीभ्रूणहत्या, प्रदूषण उच्चाटन यासह वास्तव शिक्षण याबाबत त्यांनी जागृती केली. श्रीनगर ते कन्याकुमारी हे अंतर पार केल्याबद्दल त्यांची लिम्का बुकमध्ये नोंद झाली होती. भुस्कुटे हे बँक आॅफ इंडियातून निवृत्त झाले आहेत. रविवारी त्यांचा शहरातर्फे सत्कार-मिरवणूक त्याचबरोबर पालिकेत सत्काराचा प्रस्ताव नगरसेविका पूजा योगेश म्हात्रे यांच्यामुळे झाल्याची माहिती समाजसेवक राजू नलावडे यांनी दिली.