कल्याण : उल्हास नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णी काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नदीपात्रातील पाण्यात एका होडीत बसून मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी आज उपोषण केले. त्यांचे हे अनोखे उपोषण सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.उल्हास नदी ही एकमेव जलउद्भव आहे. ही नदी बारमाही वाहणारीआहे. या नदीत आंध्र व बारवी धरणांतून पाणी सोडले जाते. धरणात पुरेसा पाणीसाठा नाही. नदीपात्रातून कल्याण-डोंबिवली महापालिका, एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, स्टेम आदी पाणीग्राहक स्थानिक स्वराज्य संस्था पाणी उचलतात. नदीपात्रातून पाणी उचलण्यावर निर्बंध घातल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. आठवड्यातून केवळ साडेचार दिवसच पाणी मिळते. पाण्याची समस्या असताना नदीपात्रातील पाण्यावर जलपर्णीचे आच्छादन तयार झालेले आहे. जलपर्णी काढण्यासाठी माजी नगरसेवक निकम यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी आज नदीपात्रातील जलपर्णींमध्ये होडी नेऊन होडीत बसून उपोषण केले. उल्हास नदीवरील मोहने बंधाऱ्यातून पाणीगळती होते. चांगले पाणी थेट कल्याण खाडीला मिळते. ही पाणीगळती रोखता येईल.महापालिका मोहने बंधारा येथून पाणी उचलते. नाल्यातून वाहून येणारा कचरा थेट मोहने बंधाऱ्यात जाऊन मिळू नये, यासाठी मोठी लोखंडी जाळी बसवली आहे. जाळी बसवलेली असतानादेखील नाल्यातून अनेकदा मेलेली जनावरे व सांडपाणी नदीच्या पाण्यात येऊन मिळते. नदीतून कोणी किती पाणी उचलावे, यासाठी लघुपाटबंधारे नियंत्रण ठेवते. तसेच अनेक पाणीग्राहक संस्था पाणी उचलतात. त्यांना पाण्यावर साचलेली जलपर्णी दूर करणे व प्रदूषण रोखणे, यासाठी पुढाकार घ्यावासा वाटत नाही. लघुपाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सुभाष वाघमारे म्हणाले, चार दिवसांपासून नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू असून मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे उल्हासनगर महापालिका प्रशासनकडे मनुष्यबळाची मागणी केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
उल्हास नदीपात्रात माजी नगरसेवकाने मांडले ठाण
By admin | Published: March 03, 2016 2:06 AM