अखेर ११ वर्षांनी मिळाला मुहूर्त
By admin | Published: March 2, 2016 01:55 AM2016-03-02T01:55:41+5:302016-03-02T01:55:41+5:30
सॅटीस प्रकल्प राबवण्यापूर्वी प्रस्तावित असलेल्या कोर्ट नाका ते स्टेशनपर्यंतच्या डीपी रोडच्या रुंदीकरणाला अखेर ११ वर्षांनंतर महापालिकेला मुहूर्त सापडला असून मंगळवारपासून या कारवाईस सुरवात झाली.
ठाणे : सॅटीस प्रकल्प राबवण्यापूर्वी प्रस्तावित असलेल्या कोर्ट नाका ते स्टेशनपर्यंतच्या डीपी रोडच्या रुंदीकरणाला अखेर ११ वर्षांनंतर महापालिकेला मुहूर्त सापडला असून मंगळवारपासून या कारवाईस सुरवात झाली. पहिल्याच दिवशी तळ अधिक दोन मजल्याच्या कोहिनूर इमारतीसह जवळपास ४५५ बाधित बांधकामे आणि बिल्डिंगलाईन वाढविलेली शेड्स तोडण्यात आले. या कारवाईला तेथील व्यावसायिकांपासून नागरिकांनीही उत्स्फूर्त पाठिंबा दिला. तर एका ८० वर्षाच्या वृद्धाने चक्क आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस उपआयुक्त सचिन पाटील यांच्यासह सर्वानाच चॉकलेट वाटून या कारवाईचे आगळेवेगळे स्वागत केले. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनीही हात उंचावून या कारवाईस पाठिंबा दर्शविला. तर महापालिका आयुक्तांनी तब्बल तीन तास पायी चालत संपूर्ण स्टेशन परिसर पिंजून काढला.
तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या काळात पहिल्यांदा ठाणे शहराने मोकळा श्वास घेतला होता. स्टेशन परिसर मोकळा करण्याचे पहिले धाडस चंद्रशेखर यांनीच केले. मात्र त्यानंतर शहराचा वाढलेला विस्तार आणि वाढती प्रवासी संख्या यामुळे ठाणे स्टेशन परिसरात पुन्हा वाहतूककोंडीला ठाणेकरांना तोंड द्यावे लागत आहे. ती सोडवण्यासाठी २००६ साली नेताजी सुभाष पथ ( स्टेशन रोड ) या ठाणे महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील १८ मीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानंतर २००७ साली झालेल्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये देखील सुभाष पथ येथील सिद्धिविनायक मंदिर ते अमेरिकन वॉच कंपनी दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण करण्याचा प्रस्ताव होता. (प्रतिनिधी)एसटी स्टँडपासून पुढे कोहिनूर इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सुमारे २० ते २५ दुकान गाळे तोडण्यात आले. जनरल पोस्ट आॅफीस ते अलोक हॉटेल पर्यंत जी बांधकामे बिल्डींग लाईनच्या बाहेर केली होती, ती जवळपास ६० बाधित बांधकामे तोडली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे असलेल्या हॉटेल रिजन्सीचे शेड्स त्याचप्रमाणे मंगला चेंबर्स ते हॉटेल अलोक या दरम्यान दुकानांच्याबाहेरील जवळपास ६० शेड्सही तोडण्यात आल्या. यावेळी स्टेशनच्या बाहेरील तळ अधिक दोन मजल्याची कोहिनूर इमारतही तोडण्याची कारवाई करण्यात आली.
याबाबतीत वारंवार सुचना देऊनही संबधितांनी कुठलीच कार्यवाही केली नसल्याने आणि ती अतिधोकादायक असल्याने कधीही कोसळून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई केली. ही इमारत तोडल्यामुळे सॅटीसकडून स्टेशनकडे जाण्यासाठी एकमार्गी स्वतंत्र मार्गिका तयार होणार आहे.यावेळी महापालिका आयुक्तांनी राघोबा शंकर रोडवरील वाढीव अनधिकृत बांधकामधारकांना ८ दिवसाची मुदत दिली असून ८ दिवसात त्यांनी स्वत:हुन वाढीव बांधकामे तोडण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ही कारवाई उपआयुक्त अतिक्र मण अशोक बुरपल्ले, परिमंडळ २ चे उपआयुक्त संजय हेरवाडे, नगर अभियंता रतन अवसरमोल, उपनगर अभियंता राजन खांडपेकर, शहर नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर, सहाय्यक आयुक्त मंगल शिंदे, कार्यकारी अभियंता हातीम अली यांनी १०० महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने केली.सकाळी १० वाजता कडेकोट पोलिस बंदोबस्तात महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुनील चव्हाण, अशोककुमार रणखांब यांच्या उपस्थितीत कारवाईस सुरु वात झाली.
४ जेसीबी, १ पोकलेन मशीनद्वारे ती करण्यात आली. या कारवाईअंतर्गत सुभाष पथावरील जनता फॅशन हाऊस ते अशोक टॉकीज पर्यंत बिल्डींग लाईन सोडून केलेली जवळपास ३०० वाढीव बांधकामे हटविली. त्याचप्रमाणे एसटी स्थानकाच्या बाहेर अनधिकृतपणे बांधलेले ८ ते १० दुकान गाळे तोडण्यात आले.