वसई-विरार: जागा मिळेल तिथे आहेत रिक्षा स्टॅण्ड
By Admin | Published: March 3, 2016 02:02 AM2016-03-03T02:02:07+5:302016-03-03T02:02:07+5:30
१५ हजाराहून अधिक रिक्षा असलेल्या या तालुक्यात काही अपवाद वगळता अधिकृत रिक्षा स्टँड नाही. त्यामुळे रिक्षा चालकांनी रेल्वे स्टेशनचा परिसर व्यापून टाकला आहे
शशी करपे, वसर्ई
१५ हजाराहून अधिक रिक्षा असलेल्या या तालुक्यात काही अपवाद वगळता अधिकृत रिक्षा स्टँड नाही. त्यामुळे रिक्षा चालकांनी रेल्वे स्टेशनचा परिसर व्यापून टाकला आहे. तसेच शहरात नवीन वसाहती होत गेल्या तस-तसे नाका तिथे स्टँड तयार झाले. परिणामी बेकायदा रिक्षा स्टँडनी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या जटील करून ठेवली आहे.
विरार शहरात पश्चिमेला स्टेशनलगत पूर्वी एसटी स्टँड होते. स्टँड स्थलांतरीत झाल्यानंतर रिक्षांनी ती जागा व्यापली. पण, रेल्वे स्टेशन वाढत गेल्यानंतर रिक्षा स्टँडची जागा कमी होऊन रिक्षा थेट रस्त्यावर आल्या आहेत. पूर्वेला तर रस्ता अपुरा असतानाही तिथे दोन्ही बाजूला रिक्षा स्टँड तयार झाले. त्यामुळे पूर्व आणि पश्चिमेला स्टेशनलगत रिक्षांच्या गर्दीने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण केला आहे. नालासोपारा स्टेशन परिसरातही तिच स्थिती आहे. पश्चिमेला जागा नसल्याने उड्डाणपूलाखालची जागा रिक्शा चालकांनी व्यापून टाकली आहे. त्यामुळे मुख्य रस्ता गायब झाला आहे. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनली आहे.
पूर्वेला उड्डाणपूलाखालची जागा रिक्षा स्टँडसाठी होती. ती अपुरी पडत असतानांच आता महापालिकेच्या परिवहन सेवेने जागा व्यापली आहे. पलिकडे स्टेशनलगत रिक्षा स्टँड होते. पण, एका नगरसेवकांने रेल्वेच्या ताब्यात असलेली जागा वडिलोपार्जित असल्याचा दावा करून तेथील रिक्षा स्टँड हटवून त्या जागेचा ताबा घेतला आहे. त्यामुळे पूर्वेला थेट मुख्य रस्त्यावर रिक्षा उभ्या राहू लागल्याने वाहतूक कोंडीने लोकांना त्रस्त केले आहे. सहा वर्षे उलटली तरी सिग्नल नाही
पालिका निर्माण होऊन सहा वर्षे उलटून गेली असून अद्याप सिग्नल उभारलेले नाहीत. शहरातील अनेक भागातील मुख्य रस्ते इतके अरुंद आहेत की गर्दीच्या वेळी सिग्नल यंत्रणा कशी कार्यान्वित होणार? हा प्रश्न निर्माण होतो. अधिकृत रिक्षा स्टँड करण्यात पोलीस आणि पालिका प्रशासन यशस्वी होत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणे अवघड होणार आहे. मध्यंतरी आरटीओकडून तालुक्यातील १५० ठिकाणांचा स्टँडसाठी सर्व्हे देखील करण्यात आला आहे. पण, गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण कसे करणार? नव्या स्टँडसाठी पुरेशी जागा कशी उपलब्ध होणार हा खरा प्रश्न आहे.
थेट मुख्य रस्त्यावर अतिक्रमण
वसई रोड रेल्वे परिसरातही अशीच स्थिती आहे. पश्चिमेचा रिक्षा स्टँड स्टेशनचा कायापालट झाल्याने आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे रिक्षांनी थेट मुख्य रस्ता व्यापून टाकला असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यातच आता महापालिका परिवहनचा थांबा मुख्य रस्त्यावर आल्याने स्टेशनला जोडणारा मुख्य रस्ता रिक्षा आणि बसेसपुरताच उरला आहे. त्यांच्या गर्दीतून वाट काढत चालणे देखील जिकीरीची होऊन बसले आहे. पूर्वेची परिस्थिती तर खूपच भयावह आहे. रिक्षा स्टँड आणि परिवहन सेवेच्या बसेसनी रस्ता व्यापून टाकला आहे.