कापूस पोहोचला ५,२३० रुपयांवर
By admin | Published: January 2, 2017 12:24 AM2017-01-02T00:24:47+5:302017-01-02T00:24:47+5:30
चलनी नोटांचा तुटवडा आणि कापसाचे घटलेले उत्पादन यामुळे जिल्ह्यात कापसाचे दर ५ हजार २३० रूपयांपर्यंत वर चढले आहेत.
सोयाबीन जैसे थे : तुरीचे दर घसरले, चढ-उताराने शेतकरी हादरला
यवतमाळ : चलनी नोटांचा तुटवडा आणि कापसाचे घटलेले उत्पादन यामुळे जिल्ह्यात कापसाचे दर ५ हजार २३० रूपयांपर्यंत वर चढले आहेत. तर सोयाबीनचे दर ‘जैसे थे’ असून तुरीच्या दरात घसरण नोंदविण्यात आली आहे. बाजारातील शेतमालाच्या चढ-उताराने शेतकरी हादरले आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र कापूस लागवडीचे आहे. मात्र अतिपावसाने कापसाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. यामुळे एकरी उत्पादन घटले आहे. थोडाथोडका निघालेला कापूस शेतकऱ्यांनी विक्रीस आणला आहे. मुळात कापसाचे उत्पादनच कमी असल्याने बाजारपेठेत आवकही कमी आहे. संपूर्ण देशभरात अशीच स्थिती आहे. यामुळे बाजारात कापसाचे दर वधारले आहे. ५ हजार रूपये क्विंटलचा कापूस सध्या ५ हजार २३० रूपये क्विंटलच्या घरात पोहोचला आहे. यामध्ये पूर्वीच्या तुलनेत २३० रूपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत कापसाच्या दरात ७०० रूपयांने सुधार नोंदविण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)
तूर साडेचार हजारांवर
स्थितीत तुरीचे दर १० हजार रूपये क्विंटलवरून ४ हजार ५०० रूपये क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. तुरीच्या दरात निम्म्याने घट नोंदविण्यात आली आहे. शेतमालाच्या दरातील चढ-उताराने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. यावर सरकारने ठोस पावले उचलण्याची नितांत गरज आहे. तरच शेतकरी आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे.