“आपटे अद्यापही मोकाट, पाकिस्तानात पळून गेले का? फडणवीसांचा राजीनामा घ्या”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 05:22 PM2024-09-03T17:22:41+5:302024-09-03T17:24:32+5:30

Congress Nana Patole News: अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी निवडणूक लावावी म्हणजे जनता समोर येऊन काय करेल ते त्यांना दिसेल, असा पलटवार नाना पटोलेंनी केला.

congress nana patole criticized bjp rss and mahayuti govt over badlapur and shivaji maharaj statue collapsed issue | “आपटे अद्यापही मोकाट, पाकिस्तानात पळून गेले का? फडणवीसांचा राजीनामा घ्या”: नाना पटोले

“आपटे अद्यापही मोकाट, पाकिस्तानात पळून गेले का? फडणवीसांचा राजीनामा घ्या”: नाना पटोले

Congress Nana Patole News: बदलापूर घटनेतील आरोपी आपटे व शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अजून अटक का झाली नाही? ते पाकिस्तानात पळून गेले काय? महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फेल झाले आहेत तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला  बदलापूर घटनेतील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्याचा राजीनामा घ्यावा व पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी भाजपा महायुती सरकारवर तोफ डागली. बदलापूरमध्ये चिमुरड्यांवर १५ दिवस अत्याचार सुरु होते, हे उघड झाले आहे. शाळेतील १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेजही गायब आहे. बदलापूर पोलीस स्टेशनमधील महिला अधिकाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांची मुंबईत बदली करुन एकप्रकारे बक्षिसच दिले आहे. ही शाळा भाजपा आरएसएसशी संबंधित असल्याने शाळा संचालक आपटेला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे त्यात योगदान दिसत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर...

पोस्टरला काय जोडे मारता हिम्मत असेल तर समोर, या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी निवडणूक लावावी म्हणजे जनता समोर येऊन काय करेल ते त्यांना दिसेल. तसेच भाजपा आमदार नितेश राणेंबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, नितेश राणे पोलिसांनाच शिव्या देतो, धमक्या देतो पण त्याच्यावर कारवाई केली जात नाही. कोणाच्याही धर्माला शिव्या देण्याचा अधिकार कोणालाच नाही पण निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात शांतता रहावी ही आमची भूमिका आहे. सामाजिक वातावरण बिघडण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, जातनिहाय जनगणनेचे राजकारण करु नये, या आरएसएसच्या विधानावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, यात राजकारण नाही. शोषित, वंचित, पीडित समाजाला शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक फायदा मिळावा व समाजाच्या मुख्य प्रवाहात या घटकांना आणण्यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. या समाज घटकांचे भले व्हावे हीच त्यामागची भूमिका आहे. भाजपा सरकार मागास समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत नाही, उच्च शिक्षणाचे दरवाजे बंद करत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेकदा आरक्षण संपवले पाहिजे, अशी जाहीर भूमिका मांडलेली आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.


 

Web Title: congress nana patole criticized bjp rss and mahayuti govt over badlapur and shivaji maharaj statue collapsed issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.