उमदा कार्यकर्ता गमावला, मानस यांच्या निधनाने हळहळ; नेतेमंडळींकडूनही शोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 14:55 IST2023-02-02T14:54:04+5:302023-02-02T14:55:12+5:30
काँग्रेसमधील त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती.

उमदा कार्यकर्ता गमावला, मानस यांच्या निधनाने हळहळ; नेतेमंडळींकडूनही शोक
मुंबई - नाशिक जिल्हा ग्रामीणचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन झाले. वयाच्या ३२ व्या वर्षी आपला कार्यकर्ता मित्र, वैचारीक बैठकांची धार असलेल्या पदाधिकारी आणि सोशल मीडियावर भूमिका मांडणारा मित्र गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानस पगार हे युवक काँग्रेसमधील चर्चेतला चेहरा म्हणून ओळखले जायचे. सोशल मीडियावर ते पक्षाची भूमिका मुद्देसूद आणि सशक्तपणे मांडायचे. त्यातूनच, सोशल मीडियावर त्याचा मोठा मित्रपरिवार तयार झाला होता. मात्र, आज सकाळीच त्यांच्या निधनाचे वृत्त धडकले अन् सर्वांना धक्का बसला.
काँग्रेसमधील त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात त्यांनी आपले प्राण गमावले. पगार यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाच्या युवक संघटनेचीही हानी झाली आहे. म्हणूनच, सोशल मीडियावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच, पगार कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.
माझा सहकारी,काँग्रेस पक्षाचा धडाडीचा कार्यकर्ता आणि नाशिक युवक जिल्हाध्यक्ष मानस पगार याच अपघाती दुर्दैवी निधन झाल्याची धक्कादायक बातमी समजली.काँग्रेसने आणि आपण सर्वांनीच एक उमदा कार्यकर्ता गमावला आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 2, 2023
पगार कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सोबत आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली..! pic.twitter.com/pePd8mJUWw
माझा सहकारी,काँग्रेस पक्षाचा धडाडीचा कार्यकर्ता आणि नाशिक युवक जिल्हाध्यक्ष मानस पगार याच अपघाती दुर्दैवी निधन झाल्याची धक्कादायक बातमी समजली.काँग्रेसने आणि आपण सर्वांनीच एक उमदा कार्यकर्ता गमावला आहे, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, मानस पगार यांच्या निधनाच्यावृत्ताने सोशल मीडियावरील त्यांच्या मित्रपरिवारालाही धक्का बसला आहे. अनेकांच्या त्यांच्या आठवणी आणि भेटीचे प्रसंग व्यक्त करत शोक व्यक्त केला.