'खंडणीखोरांना समर्पण कळलेच नाही, श्री राम सेवा काय कळणार'
By महेश गलांडे | Updated: March 4, 2021 18:05 IST2021-03-04T18:05:28+5:302021-03-04T18:05:45+5:30
नाना पटोले यांच्या आरोपानंतर विधानसभेत एकच गदारोळ उडाला. भाजप नेत्यांनी पटोलेंच्या आरोपावर आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांना सभागृहाचं कामकाज काहीकाळ स्थगित करावं लागलं

'खंडणीखोरांना समर्पण कळलेच नाही, श्री राम सेवा काय कळणार'
मुंबई - अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपकडून देशभर निधी संकलन केलं जात आहे. भाजपच्या या अभियानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. "भगवान श्री रामाच्या नावाखाली देणगी जमा करण्याचा ठेका भाजपला दिलाय का? ते कोणत्या नियमाखाली ही देणगी जमा करत आहेत? राम मंदिराच्या नावाखाली टोलवसुली सुरूय", असा आरोप नाना पटोले यांनी विधानसभेत केला आहे. (Nana Patole allegations on bjp over ram mandir fund collection in state) त्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलंय.
नाना पटोले यांच्या आरोपानंतर विधानसभेत एकच गदारोळ उडाला. भाजप नेत्यांनी पटोलेंच्या आरोपावर आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांना सभागृहाचं कामकाज काहीकाळ स्थगित करावं लागलं. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या बाहेर येऊन मीडियाशी संवाद साधताना काँग्रेससह महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांवर जबरी टीका केली.
''श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी गोळा करणे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना वसुली वाटते. ज्यांना कधी श्रीराम कळलेच नाहीत त्यांना श्रीराम सेवा काय कळणार ! खंडणीखोरांना समर्पण हे कधीच कळले नाही आणि कळणारही नाही. श्रीराम हा आमचा धर्म आहे आणि कर्मही! ।। जय श्रीराम ।।'', असे ट्विट भाजपाने केलंय. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनीही खंडणी वसुली करणारांना सेवा काय कळणार, असे म्हटलंय.
बळे आगळा राम कोदंडधारी !
महाकाळ विक्राळ तोही थरारी !!
पुढे मानवा किंकरा कोण केवा !
प्रभाते मनी राम चिंतीत जावा !!
श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी गोळा करणे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना वसुली वाटते. ज्यांना कधी श्रीराम कळलेच नाहीत त्यांना श्रीराम सेवा काय कळणार ! खंडणीखोरांना समर्पण हे कधीच कळले नाही आणि कळणारही नाही. श्रीराम हा आमचा धर्म आहे आणि कर्मही! ।। जय श्रीराम ।। @NANA_PATOLEpic.twitter.com/HnRx1OiRag
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 4, 2021
नाना पटोलेंचा सवाल
राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलत असताना नाना पटोले यांनी भाजपसमोर अनेक सवाल उपस्थित केले. "राम मंदिराच्या नावानं टोलवसुली केली जातेय. भाजपला हा अधिकार कुणी दिला? ज्यानं राम मंदिरासाठी निधी दिला नाही त्याला त्रास दिला जातोय अशी एक तक्रार देखील माझ्याकडे आलीय", असं नाना पटोले यावेळी म्हणाले. "महाराष्ट्रामध्ये भगवान रामाच्या नावानं पैसे जमा करणारे हे लोक कोण? त्यांना ठेका दिलेला आहे का? केंद्र सरकारनं याचा उत्तर द्यायला हवं", असे सवाल उपस्थित करत नाना पटोले आक्रमक झाले होते.