रुग्णसंख्या घटली तरी गाफीलपणा नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:24 AM2021-05-25T04:24:00+5:302021-05-25T04:24:00+5:30
अहमदनगर : गेले काही दिवस जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटताना दिसत असली तरी, गाफील न राहता चाचण्यांच्या संख्या वाढवाव्यात. कोरोना संसर्ग ...
अहमदनगर : गेले काही दिवस जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटताना दिसत असली तरी, गाफील न राहता चाचण्यांच्या संख्या वाढवाव्यात. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गाव हे केंद्र मानून कार्यवाही केली जात आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संभाव्य रुग्णांना शोधा आणि त्यांच्या चाचण्या करून घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणेला दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सोमवारी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला व कोरोना उपाययोजना आणि त्याबाबत येणाऱ्या अडचणी, करावयाची कार्यवाही आदींबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे उपस्थित होते.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील बाधित रुग्णसंख्या जास्त असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. त्यात त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील होम आयसोलेशन (गृह विलगीकरण) पूर्णपणे बंद करण्याच्या आणि आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले.
सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची ॲन्टिजेन चाचणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. मात्र, अद्यापही काही नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात कार्यवाहीची गती कमी आहे. एकीकडे चाचण्यांची संख्या वाढेल तसे त्या चाचण्यांची नोंद तात्काळ पोर्टलवर घेणे आवश्यक आहे. प्रत्येक तहसीलदारांनी याबाबत आढावा घेऊन नोंदी प्रलंबित राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.
---
याबाबत दक्षता घ्या...
कोविड केअर सेंटरमधील स्वच्छता
मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगबाबत प्रोत्साहन
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई
आदर्श गाव हिवरे बाजार मॉडेल राबविणे
माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाची अंमलबजावणी
पथकांद्वारे घरोघरी जाऊन सर्वेक्षण
------------