विनाकारण फिरणाऱ्या पावणेदोनशे जणांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:24 AM2021-05-25T04:24:22+5:302021-05-25T04:24:22+5:30
सोमवारी नेहमी राजूरचा आठवडी बाजार असतो. मात्र मागील पंधरा दिवसांपासून राजूर बंद असल्याने राजूरमधील गर्दीला लगाम लागला होता. आजच्या ...
सोमवारी नेहमी राजूरचा आठवडी बाजार असतो. मात्र मागील पंधरा दिवसांपासून राजूर बंद असल्याने राजूरमधील गर्दीला लगाम लागला होता. आजच्या बंदचा मेसेज रविवारी रात्री उशिराने गेल्याने सोमवारी सकाळी राजूरमध्ये भाजीपाला आणि किराणा खरेदीसाठी गर्दी होऊ लागली होती, हे पाहताच राजूर पोलिसांनी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजूरमध्ये काम नसताना तसेच बाजारपेठेत फिरणाऱ्यांची वैद्यकीय अधिकारी डॉ. रामनाथ दिघे यांच्या नेतृत्वाखाली आरटीपीसीआर कारवाई सुरू केली. बघता बघता राजूरमधील गर्दी पांगली. सोमवारी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिघे यांनी पन्नासाहून अधिक लोकांची कोरोना चाचणी घेतली. याचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
शेंडी, भंडारदरा परिसरातही विनाकारण फिरणारांची संख्या वाढत असल्याचे पाहून सहायक निरीक्षक साबळे आणि पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार व पोलीस कर्मचाऱ्यांनी तेथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली. सोमवारी शेंडी, भंडारदरा येथे तब्बल ११४ लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली, सुदैवाने यात सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली.
दरम्यान, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.