लग्न समारंभासाठी पूर्वपरवानगी आवश्यक, आठवडे बाजारही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 14:27 IST2021-03-26T14:27:30+5:302021-03-26T14:27:58+5:30
अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लग्न समारंभ आणि साखरपुडा यासारख्या धार्मिक समारंभाचे आयोजनास संबंधित पोलीस ...

लग्न समारंभासाठी पूर्वपरवानगी आवश्यक, आठवडे बाजारही बंद
अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लग्न समारंभ आणि साखरपुडा यासारख्या धार्मिक समारंभाचे आयोजनास संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार २९ मार्चपासून ते १५ एप्रिल, २०२१ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी शुक्रवारी (दि. २६) आदेश जारी केले आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते साथरोग अधिनियमानुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात विवाह समारंभास जास्तीत जास्त ५० व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी आहे. मात्र, लग्न समारंभ असलेले मंगल कार्यालये, लॉन्स, मॅरेज हॉल, आणि इतर समारंभाचे ठिकाणी ५० व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणे, सोशल डिस्टंन्सिंग, गर्दीचे व्यवस्थापन, समारंभ ठिकाणचे निर्जतुकीकरण, उपस्थित व्यक्तींसाठी सॅनिटायझरची व्यवस्था, ऑक्सीमीटरची व्यवस्था या व अन्य कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंगल कार्यालयांना १० हजार रुपये दंड करण्यात येत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी आता लग्न समारंभ, साखरपुडा या सारख्या धार्मिक समारंभ आयोजनास आता संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.