मनातील भीती दूर करा, कोरोनासोबत जगायला शिका; सकारात्मक विचारातून नैराश्य संपते, मानसोपचार तज्ज्ञांचे मत

By अरुण वाघमोडे | Published: June 19, 2020 05:19 PM2020-06-19T17:19:19+5:302020-06-19T17:22:57+5:30

कोरोनामुळे काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी  प्रत्येकाला यावर मात करणे सहज शक्य आहे. प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि मनमोकळा संवाद यातून कुठलीही भीती आणि नैराश्यावर विजय मिळविता येतो असे मत ‘लोकमत’च्यावतीने आयोजित आॅनलाईन परिसंवादात मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Take away the fear in your heart, learn to live with Corona; Positive thinking eliminates depression, says psychiatrist | मनातील भीती दूर करा, कोरोनासोबत जगायला शिका; सकारात्मक विचारातून नैराश्य संपते, मानसोपचार तज्ज्ञांचे मत

मनातील भीती दूर करा, कोरोनासोबत जगायला शिका; सकारात्मक विचारातून नैराश्य संपते, मानसोपचार तज्ज्ञांचे मत

लोकमत आॅनलाईन परिसंवाद   

अहमदनगर : कोरोना या साथीच्या आजारामुळे गेल्या तीन महिन्यांपासून प्रत्येकाच्या मनात भीती, चिंता, नैराश्य आणि भविष्याची काळजी असे एक भयावह वातावरणाचे काहूर निर्माण झाले आहे. कोरोना या आजारापेक्षा त्याच्या भितीने जास्त लोक प्रभावित झाले असून, मानसोपचार तज्ज्ञांकडील गर्दी वाढली आहे. प्रत्यक्षात मात्र भीती घेऊन आणि कुढत जगावे अशी परिस्थिती मुळीच नाही. कोरोनामुळे काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी  प्रत्येकाला यावर मात करणे सहज शक्य आहे. प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि मनमोकळा संवाद यातून कुठलीही भीती आणि नैराश्यावर विजय मिळविता येतो असे मत ‘लोकमत’च्यावतीने आयोजित आॅनलाईन परिसंवादात मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले.

या परिसंवादात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमित सपकाळ, डॉ़. अश्विन झालाणी व मानसशास्त्रज्ञ प्रा. योगिता खेडकर हे सहभागी झाले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाले. अनेकांच्या नोक-या गेल्या. शारीरिक आरोग्य राखण्यासह जगण्यासाठीही संघर्ष सुरू आहे. समाजातील अनेकांनी बदलेले हे वातावरण आत्मसात करत आपली ‘रुटीन लाईफ’ सुरू केली आहे. बहुतांशी जणांना मात्र ही नवीन जीवनशैली आत्मसात करण्यात अडचणी निर्माण होत आहे. अशा लोकांचा मानसिक संघर्ष सुरू आहे. त्यांना वर्तमानासह भविष्याची चिंता सतावत आहे. यातून डिप्रेशन निर्माण होऊन काही जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. मानवी जीवन मात्र अनमोल आहे. आजपर्यंत माणसाने प्रत्येक संकटावर मात करत आपले अस्तित्व सिध्द केले. हे़ आताही मनातील भीती दूर करून प्रत्येकाने कोरोनासोबत मोठ्या हिमतीने जगायला शिकावे, असा सल्ला परिसंवादातून मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अगदी छोट्या-छोट्या गोष्टींना लोक घाबरत आहेत. यातून कोरोनाचे नव्हे तर भितीचे पेशंट वाढत आहे. प्रत्यक्षात कोरोनाचा मृत्यूदर अतिशय कमी आहे़. त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. सोशल मीडियातून पसरणाºया अफवांवर विश्वास ठेवू नये, स्वत:ला कामात गुंतवून घ्यावे. कितीही अडचण असली तरी येणा-या काळात ही परिस्थिती नक्कीच बदलणार आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोण ठेवून जगायला शिकावे. 
    -डॉ़. अमित सपकाळ, मानसोपचार तज्ज्ञ.

सकारात्मक विचार, मनमोकळा संवाद, नियमित व्यायाम, घराबाहेर पडल्यानंतर नियमांचे पालन आणि चांगला आहार ही पंचसूत्री आत्मसात केली तर कुणालाच अडचण निर्माण होणार नाही. नको त्या बाबींचा विचार करणे, विनाकारण चिंता आणि भविष्याची सतत काळजी यातून चिडचिड निर्माण होऊन आपले आरोग्य आणि कुटुंबावरही त्याचा विपरित परिणाम होतो़. यासाठी बदल्या परिस्थितीनुसार स्वत: बदल करा, मित्र, कुटुंबीयांना समजून घ्या़ यातून प्रत्येक समस्या आणि प्रश्नाचे उत्तर मिळेल. 
    - डॉ़.अश्विन झालाणी, मानसोपचार तज्ज्ञ.

कोरोना हा साथीचा आजार अथवा यामुळे निर्माण झालेली परिस्थितीही लवकर संपणारी नाही. नव्याने ओढावलेल्या या आपत्तीमुळे सर्वांच्या जीवनावर कमी अधिक परिणाम झालेला आहे. त्यामुळे या गोष्टींवर जास्त विचार न करता प्रत्येक अडचणीतून नव्याने वाट शोधण्याची गरज आहे. आता काहीच शक्य नाही अथवा आत्महत्येचा विचार हा कधीच उपाय ठरू शकत नाही. आजही प्रत्येकासाठी अनेक संधी आहेत. दृष्टिकोन बदलून या संधीचा शोध घ्यावा. जगण्याचा नवा नक्कीच मार्ग सापडेल़.
    - प्रा. योगिता खेडकर, मानसशास्त्रज्ञ. 

Web Title: Take away the fear in your heart, learn to live with Corona; Positive thinking eliminates depression, says psychiatrist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.