निळवंडेची पाणीपातळी ६१० मीटरवर स्थिर ठेवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:24 AM2021-05-25T04:24:28+5:302021-05-25T04:24:28+5:30
निळवंडे धरणातील पाण्याची पातळी नेहमी किमान ६१० मीटर असणे आवश्यक आहे. मात्र यंदा अधिक प्रमाणात पाणी सोडल्यामुळे निळवंंडे ...
निळवंडे धरणातील पाण्याची पातळी नेहमी किमान ६१० मीटर असणे आवश्यक आहे. मात्र यंदा अधिक प्रमाणात पाणी सोडल्यामुळे निळवंंडे धरणाच्या पाण्याची पातळी ६१० मीटरपेक्षा कमी झाली. त्यामुळे आदिवासी भागातील अनेक गावांतील उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न तयार झाला असल्याने निळवंडे धरणातील पाण्याची पातळी वाढविणे गरजेचे आहे.
निळवंडे धरणाच्या पाण्याची पातळी कमी ठेवल्याने
राजूर-केळुंगण-कोहकडी, पिंपरकणे-शेलविहीरे व पिंपळगाव नाकविंदा या तीन उपसा जलसिंचन योजना बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे मोहोंडूळवाडी, माळेगाव, कातळापूर, कोदणी, रणद बु, लाडगाव, टिटवी, शेणित, मान्हेरे, अंबेवंगण या सर्व गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. राजूर हे गाव १५ हजारांपेक्षा जास्त लोकवस्तीचे आहे व इतर गावे हे ३ हजार पेक्षा जास्त लोकवस्तीचे आहेत. तरी शासनाने धरणाच्या पाण्याची ६१० मीटर करावी, अन्यथा येथील सर्व गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर जलसंपदा विभागाकडून उपलब्ध करून देणे संदर्भात कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे आहे.
तसेच राजूर- केळुंगण-कोहंडी, पिंपरकणे-शेलविहीरे व पिंपळगाव नाकविंदा या तीनही उपसा जलसिंचन योजनेचे पाणीपट्टीचे बिल शेतकऱ्यांकडून वसूल केले जाते. मात्र पाण्याचे नियोजन न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येते. पाण्याअभावी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी व आदिवासी भागातील जनतेला पिण्याचे पाणी त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी पिचड यांनी जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.