कोल्हे कारखान्यात एआय तंत्रज्ञान वापर सुरू: विवेक कोल्हे 

By सचिन धर्मापुरीकर | Published: July 15, 2024 01:47 PM2024-07-15T13:47:20+5:302024-07-15T13:48:28+5:30

एआय तंत्रज्ञान वापरणारा देशातील पहिला कारखाना.

AI technology to be used in Kolhe factory Vivek Kolhe  | कोल्हे कारखान्यात एआय तंत्रज्ञान वापर सुरू: विवेक कोल्हे 

कोल्हे कारखान्यात एआय तंत्रज्ञान वापर सुरू: विवेक कोल्हे 

लोकमत न्यूज नेटवर्क, सचिन धर्मापुरीकर
कोपरगाव (जि. अहमदनगर) : बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत साखर कारखानदारीत अमुलाग्र बदल होत आहेत, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने हे बदल आत्मसात केले. महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीशी करार करून उपग्रह आणि कृत्रिम बुध्दीमत्तेचा (एआय) प्रभावी वापर करणारा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना देशातील पहिला साखर कारखाना ठरला असल्याची माहिती अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली.

कोल्हे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देश-विदेशातील साखर कारखान्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करत भारत देशातील साखर उद्योगास सातत्यांने मार्गदर्शन केले होते. या कारखान्यांत प्रचलीत पध्दतीनुसार साखर उतारा तपासून त्यानंतरच उस तोडणीचा कार्यक्रम राबविण्यासाठी बराच वेळ जात असे तसेच गाळप हंगाम सुरू करताना अपरिपक्व ऊसमध्येच गाळपाला आला तर साखर उताऱ्यावर परिणाम होत होता, त्यासाठी कारखान्यांने महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीशी करार करून उपग्रहाद्वारे ऊस प्लॉटचे मापन, मल्टीस्पेक्ट्रम कॅमेऱ्याच्या सहाय्यांने ऊस पिकातील हरितद्रव्य पृथक्करण करून शेतात उभ्या असलेल्या उसाची साखर उतारा तपासणी केली जाते, त्यासोबत हवामान घटकांचा देखील उपग्रहाच्या सहायांने अभ्यास केला जातो. या सर्व माहितींचे कृत्रिम बुध्दीमत्तेचे मॉडेल वापरून पृथक्करण केले जाते व प्रत्येक आठवड्याला त्यात आलेले निष्कर्ष कारखान्याच्या प्रयोगशाळेतही त्याची फेर पडताळणी केली असता ते ९५ टक्के पेक्षा अचुक आढळून आल्याने कारखान्यांने त्यावर आधारीत ऊस तोडणी कार्यक्रम राबवुन खर्चात बचत करत ०.२ टक्के अधिक साखर उतारा मिळाला आहे. कारखान्याने प्रायोगिक तत्वावर ५०० शेतकऱ्यांच्या ऊस प्लॉंटचे उपग्रहाद्वारे आलेल्या जैविक व अजैविक ताणाचे देखील निरीक्षण केले आहे. त्यातही समाधानकारक निष्कर्ष मिळाले. या सर्व माहितीचा उपयोग करून शेतावर आलेल्या कीड रोगांची माहिती तसेच पाण्याच्या ताणाचेही उपग्रहाच्या सहाय्याने पृथक्करण करून त्याचा सभासद शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे.

कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, केन मॅनेजर जी. बी. शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, महिंद्रा कंपनीचे करमयोग सिंग, मंदार गडगे, सुमित दरफले, किरण किर्दक यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी प्राधान्याने अंमलबजावणी करत आहेत.
 
कागदविरहीत कामकाज

या तंत्रज्ञानात वेळोवेळी सुधारणा करून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्व मार्गदर्शक यांच्या मदतीने टप्प्या टप्प्याने वाढ करत मागील वर्षापेक्षा साखर उताऱ्यात ०.२ टक्क्यांची समाधानकारक वाढ मिळाली आहे. २०२३-२४ या गळीत हंगामात ७ लाख ९ हजार ११२ मे. टन उसाचे गाळप करत १०.५९ टक्के साखर उतारा मिळविला आहे. पुर्णपणे कागदविरहीत कामकाज करणारा देशातील पहिला कारखाना म्हणून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची ओळख निर्माण झाली असल्याचे विवेक कोल्हे शेवटी म्हणाले.

Web Title: AI technology to be used in Kolhe factory Vivek Kolhe 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.