सदस्य-अधिकारी यांच्यात खडाजंगी
By admin | Published: August 26, 2014 11:13 PM2014-08-26T23:13:31+5:302014-08-26T23:22:05+5:30
अहमदनगर: जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे व समाज कल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांच्यात मंगळवारी दुपारी चांगलीच बाचाबाची झाली़
अहमदनगर: जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे व समाज कल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांच्यात मंगळवारी दुपारी चांगलीच बाचाबाची झाली़ घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात एकच गोंधळ उडाला़ दरम्यान या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद करून मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांचे दालन गाठले़ मात्र ते उपस्थित नव्हते़ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप यांच्याशी चर्चा झाल्यानंतर वाद निवळला़
जिल्हा परिषदेत समाज कल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांच्या दालनात दुपारी जिल्हा परिषद सदस्य परमीवर पांडुळे आले़ पांडुळे यांनी दलितवस्ती सुधार योजना आराखड्यातून आपल्या गटातील दहा गावांची नावे का वगळली, अशी विचारणा भोगले यांच्याकडे केली़ त्यावर तालुका गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या गावांचा समावेश करण्यात आला आहे़ लोकसंख्येच्या निकषानुसार गावांची निवड केली जात असल्याचे भोगले यांनी सांगितले़ मात्र पांडुळे यांचे समाधान झाले नाही़ गटातील गावे वगळल्यावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन पांडुळे दालनातून निघून गेले़ या घटनेनंतर समाजकल्याण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या दालनाकडे धाव घेतली़ परंतु नवाल उपस्थित नव्हते़ त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप यांच्याकडे मोर्चा वळविला़ कर्मचाऱ्यांनी जगताप यांची भेट घेऊन घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला़ जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून, त्यांनी याविषयी संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याचे समजते़ याविषयी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजले़ परंतु याविषयी भोगले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़ (प्रतिनिधी)
अधिकारी पोलीस ठाण्यात
समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले हे पांडुळे यांच्याविरोधात फिर्याद दाखल करण्यासाठी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.