कोकमठाण गावात ‘डेंग्यू’ने शाळकरी मुलीसह दोघांचा बळी
By admin | Published: August 11, 2016 01:09 AM2016-08-11T01:09:11+5:302016-08-11T01:12:07+5:30
कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण परिसरात ‘डेंग्यू’चा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याने शाळकरी मुलीसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण परिसरात ‘डेंग्यू’चा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याने शाळकरी मुलीसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. फरीना अश्पाक सय्यद व गोरक्षनाथ काशिनाथ लोहकणे अशी मयतांची नावे आहेत.
कोकमठाण परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणी व प्रचंड अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती होवून ‘डेंग्यू’ सारख्या भयावह रोगाचा फैलाव झाला आहे. वारंवार ताप येणे, हात-पाय दुखणे, सांधे दुखणे, थकवा येणे आदी लक्षणे नागरिकांमध्ये आढळून येत आहेत.
दरम्यान ‘डेंग्यू’ची लागण झालेल्या फरीना अश्पाक सय्यद (वय ७) या शाळकरी विद्यार्थिनीचा रविवारी मृत्यू झाला. तर गोरक्षनाथ काशिनाथ लोहकणे (वय २८) या शेतकऱ्याचा मंगळवारी उपचार चालू असताना मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप यांनी बुधवारी सकाळी कोकमठाणला भेट देत रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले.
आरोग्य तपासणीत अजय अण्णासाहेब धीवर (वय १६), गायत्री गोरख गायकवाड (वय २५), मनीषा विजय कांबळे (वय १५), नारायण माधव टेके (वय ७), विजय भगवानदास कांबळे (वय ४४), कालिदास पुंजा धीवर (वय ५३), कन्हैय्या रोहीदास संत (वय ७), जाकीर सरदार मन्सूरी (वय १८), रोहिणी सुभाष दुशींग (वय २७), सुनीता रामदास जाधव (वय ३५) व भाग्यश्री अशोक जाधव (वय १४) अशा ११ जणांना ‘डेंग्यू’ सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत.
संवत्सरचे प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. अनिकेत खोत, मलेरिया पर्यवेक्षक एन. बी. वळवी, विस्तार अधिकारी पी. जी. पाखरे, आरोग्य सहाय्यक टी. ई. माळी, जी. डी. चंदनशीव, आरोग्यसेवक एस. व्ही. महाजन, एस. एन. गांगुर्डे, जे. एस. आवारे, बी. डी. मलीक यांची आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत.
(प्रतिनिधी)
आरोग्य विभागाची ५-६ पथके तयार करण्यात आली असून घरोघरी जावून सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. पाणीसाठे तपासून डासांची उत्पत्ती थांबविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गावात दोन वेळा औषध फवारणी केली जात आहे.
४गोदावरीला आलेल्या पुरानंतर शहरातील नदीकाठ, बेट, निवारा, गजानननगर, लिंबारा मैदान, इंदिरानगर, १०५ या परिसरात हिवताप, अतिसार, चिकनगुण्या या रोगांनी थैमान घातले आहे.
आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या आहेत. तातडीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरी आरोग्याची काळजी घेत आहोत.
-सुनील देवकर,
सभापती पंचायत समिती