लोकसहभागातून दुष्काळावर मात

By admin | Published: July 30, 2016 12:19 AM2016-07-30T00:19:57+5:302016-07-30T00:31:52+5:30

योेगेश गुंड, अहमदनगर लाखो वृक्षांचे संवर्धन करून या गावाने दुष्काळावर कायमची मात तर केलीच पण संत तुकाराम वनग्राम पुरस्कारावर आपले नाव कोरले.

Due to the people's participation on drought | लोकसहभागातून दुष्काळावर मात

लोकसहभागातून दुष्काळावर मात

Next

योेगेश गुंड, अहमदनगर
कधीकाळी गर्द झाडांनी नटलेल्या या गावातील हिरवे सौंदर्य काळाच्या ओघात लोप पावले, गावाला तीव्र दुष्काळाच्या झळा बसू लागल्या, पर्जन्यमान घटले, शेतीतील उत्पन्न घसरले, पाण्याचे स्रोत आटू लागले, अशा साडेसातीत गावाने केलेल्या विचारमंथनातून गावातील शिवारात झाडे लावण्याचा निर्णय झाला. गाव हात झटकून कामाला लागले आणि कधी काळी लयास गेलेले गावाचे हिरवे सौंदर्य गावाने मोठ्या जिद्दीने व आत्मविश्वासाने परत मिळवले. लाखो वृक्षांचे संवर्धन करून या गावाने दुष्काळावर कायमची मात तर केलीच पण संत तुकाराम वनग्राम पुरस्कारावर आपले नाव कोरले.
गुंडेगाव (ता. नगर) डोंगरांच्या कुशीत वसलेले नगर तालुक्याचे शेवटचे टोक. ८५० एकर क्षेत्राचा डोंगर परिसर कधीकाळी गर्द हिरव्यागर झाडांनी नटला होता. पण काळाच्या ओघात हे हिरवे सौंदर्य नष्ट झाले. सारे डोंगर उघडे आणि बोडखे दिसू लागले. पूर्वीचे वैभव लोप पावले. दुष्काळाचे चटके गावाला असह्य करू लागले, पाण्याचे स्रोत आटू लागले, शेतीमधील उत्पादनात घट झाली, दूध उत्पादन कमी झाले. गावाचे कमी झालेले पर्जन्यमान वाढवण्यासाठी गावात वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे, हे ओळखून गावाने विचारविनिमय सुरु केला. जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, तत्कालीन सरपंच संजय कोतकर यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन गावातील डोंगर परिसर पुन्हा हिरवागार करण्याची कल्पना बोलून दाखवली. गावातील ज्येष्ठ आणि तरुण मंडळी एकत्र आली. पुढील दहा वर्षांचा वृक्ष लागवडीचा आराखडा तयार करण्यात आला. चारा बंदी, कुऱ्हाड बंदी यासारख्या कल्पनांतून काहींचा विरोध पत्करून या संकल्पना राबविण्यास सुरुवात झाली.
धावडेवाडीसारख्या डोंगर परिसरात दीड लाख औषधी वृक्षांचे रोपण करण्यात आले. स्व. परसराम धावडे यांनी वाडीतील लोकांना सोबत घेऊन या जंगलाचे व वृक्षांचे संवर्धन केले. गावातील सर्वांनी सहभाग दिल्याने दुष्काळात लाखो झाडे जगवली गेली.
काही दिवसातच उघडे आणि बोडखे दिसणारे गावाचे शिवार आणि डोंगर परिसर हिरवागार दिसू लागला. यावर्षीही गावाने सर्वांना सोबत घेऊन सुमारे दीड लाख रोपे लावली.
सरपंच डॉ. नयना भापकर, संजय कोतकर यांनी अबालवृद्धांना सोबत घेऊन ही किमया करून दाखवली. हळूहळू गाव दुष्काळावर मात करू लागला. एवढेच नाही तर राज्य सरकारने याची दखल घेऊन गावाला राज्यातील प्रथम क्रमांकाचा संत तुकाराम वनग्राम पुरस्कार जाहीर केला. या पुरस्काराचे वितरण नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
गावातील दुष्काळावर मात करण्यासाठी गावातील अबालवृद्ध, तरूण, महिला, विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी श्रमदान करून गावाला पूर्वीचे वैभव मिळवण्यासाठी कष्ट केले. वनविभाग, सामाजिक वनीकरण यांचे सहकार्य लाभले. यामुळे हे यश गावाला मिळवता आले.
—बाळासाहेब हराळ, जि. प. सदस्य

Web Title: Due to the people's participation on drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.