कर्ज माफीसाठी मुलंबाळ अन् गुराढोरांसह शेतकरी रस्त्यावर उतणार
By Admin | Published: April 6, 2017 04:05 PM2017-04-06T16:05:23+5:302017-04-06T16:05:23+5:30
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्या, कांद्यासह शेतीमालाला हमीभाव द्या व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, अन्यथा मुलबाळ अन् गुराढोरांसह शेतकरी रस्त्यावर उतरतील,
आॅनलाईन लोकमत
संगमनेर (अहमदनगर), दि़ ६- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्या, कांद्यासह शेतीमालाला हमीभाव द्या व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, अन्यथा मुलबाळ अन् गुराढोरांसह शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा भूमिपूत्र शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी झालेल्या संगमनेरातील मोर्चातून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र भूमिपूत्र शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी सकाळी मार्केट यार्डमधून निघालेला मोर्चा प्रांतकार्यालयावर धडकला. तेथे सभा झाली. उपविभागिय अधिकारी भागवत डोईफोडे यांनी निवेदन स्विकारले. कांद्यासह शेतीमालाला हमीभाव मिळावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करुन सरसकट कर्जमाफी द्यावी, संगमनेर तालुक्याच्या दुष्काळी भागाची तहान भागवण्यासाठी निळवंडे धरण कालवे पूर्ण करण्यासाठी तात्काळ पुरेसा निधी मिळावा, शेतीपंपाना पूर्ण दाबाने दिवसाच विज द्यावी, या मागण्या मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे मांडण्यात आल्या. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल देठे, संस्थापक संतोष वाडेकर, उपाध्यक्ष असिफ शेख, किरण वाबळे, अनिल लांडगे, तुकाराम हासे व किरण खैरनार यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर कडाडून टिका केली.