प्रारूप रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
By admin | Published: August 20, 2016 01:00 AM2016-08-20T01:00:59+5:302016-08-20T01:03:02+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट, गणांची प्रारुप रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे़
अहमदनगर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या डिसेंबरअखेर होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट, गणांची प्रारुप रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे़ तसे आदेश जिल्हा प्रशासनास शुक्रवारी प्राप्त झाले़ जिल्ह्यातील गटांत दोनने तर गणांत चारची घट झाली आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेचे ७३ तर पंचायत समित्यांचे १४६, असे संख्याबळ असणार आहे़
अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील गट व गण रचनेचा श्रीगणेशा झाला आहे़ राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव नि़ जा़ वागळे यांनी गट, गण आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला़ गट व गणांचा प्रारुप प्रस्ताव तयार करून तो मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांना सादर करण्याची अंतिम मुदत ९ सप्टेंबर आहे़ विभागीय आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर सदस्य पदासाठी २८ सप्टेंबर रोजी आरक्षण सोडत निघेल़ गट, गण आणि आरक्षणाची प्रारुप रचना २५ नोव्हेंबर रोजी अंतिम केली जाणार आहे़ त्यामुळे नोव्हेंबरअखेर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे़ दुसरा टप्पा गट व गणनिहाय मतदारयाद्या तयार करण्याचा असेल़ मतदारयाद्या अद्ययावत होऊन निवडणुकीचा कार्यक्रम डिसेंबर अखेरीस जाहीर होईल, अशी शक्यता प्रशासनाले वर्तविली आहे़
सन २०११ ची लोकसंख्या निवडणुकीसाठी गृहीत धरली आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या ३६ लाख आहे़ त्याआधारे गट व गणांची संख्या निवडणूक आयोगाने निश्चित केली़ जिल्हा परिषदेत सध्या ७५ गट आहेत़ आगामी निवडणुकीत २ गट कमी झाले आहे़ त्यामुळे गटांची संख्या ७५ वरून ७३ झाली आहे़ अर्थात जिल्हा परिषद सदस्यांची संख्या दोनने कमी झाली़ पंचायत समितीची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही़ जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांत सध्या १५० गण आहेत़ चार गणही कमी झाले आहेत़ त्यामुळे गणांची संख्या आता १४६ झाली आहे़ लोकसंख्या वाढल्याने सदस्य संख्या वाढणे अपेक्षित होते़ पण, जिल्ह्यात नव्याने अकोले, कर्जत आणि पारनेर शहरांना नगरपंचायतीचा दर्जा मिळाला़ त्यामुळे हा भाग जिल्हा परिषदेतून वगळला गेला़ त्याचबरोबर शेवगाव जामखेडमध्ये नव्याने नगरपालिका स्थापन झाल्या़ त्यामुळे शेवगाव व जामखेड शहर जिल्हा परिषदेतून वगळले गेले़ उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद निवडणुकीचे नोडल आॅफीसर दत्तात्रय बोरुडे व तहसीलदार गणेश मरकड यांच्या मार्गदशनाखाली तहसीलदारांमार्फत ही प्रकिया राबविण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)