सरकारने संशोधनासाठी विद्यापीठांना निधी द्यावा
By admin | Published: April 23, 2016 11:35 PM2016-04-23T23:35:35+5:302016-04-23T23:44:25+5:30
संगमनेर : भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी संधी असल्याने बुद्धिमत्तेचा वापर विकासासाठी करून देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी योगदान द्यावे.
संगमनेर : भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी संधी असल्याने बुद्धिमत्तेचा वापर विकासासाठी करून देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी योगदान द्यावे. त्याकरिता केंद्र व राज्य सरकारने संशोधनासाठी विद्यापीठांना जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शनिवारी आयोजित अमृतवाहिनी अभियांत्रिकी व अमृतवाहिनी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या पदवीग्रहण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, लक्ष्मण कुटे, दुर्गाताई तांबे, सत्यजित तांबे, शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. पाटील, प्रा. व्ही. बी. धुमाळ, अशोककुमार मिश्रा, परीक्षा विभाग प्रमुख वैभव हासे व प्रा. सय्यद आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, देशाला आर्थिक महासत्ता होण्यासाठी अजूनही अनेक क्षेत्रात मोठ्या संशोधनांची गरज आहे. विद्यार्थ्यांनी सतत संशोधन वृत्ती जोपासली पाहिजे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दूरदृष्टीतून सुरू केलेल्या या महाविद्यालयाने मागील ३० वर्षांत गुणवत्तेमुळे देशात मोठा लौकीक निर्माण केला आहे. सर्वांगीण व्यक्तिमत्व असलेले विद्यार्थी येथे घडत आहेत. भारतामध्ये नैसर्गिक साधन सामग्री जरी कमी असली, तरी बुध्दिमत्ता अफाट आहे. त्याचा वापर संशोधनासाठी होवून विद्यार्थ्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात जावून गुणवत्तापूर्वक काम करण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले.
थोरात यांनी पदवी ग्रहण हा विद्यार्थी जीवनातील मोठा क्षण असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी जगाच्या बाजारपेठेत आत्मविश्वास व गुणवत्तेने काम करण्याचे आवाहन केले. अभियांत्रिकीच्या ४५ व औषधनिर्माण शास्त्रच्या ३० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.जी.जे. विखे यांनी केले. समारंभास अॅड. माधव कानवडे, मीरा चकोर, भाऊसाहेब कुटे, प्रांताधिकारी संदीप निचीत, अजय फटांगरे, संपत गोडगे, नामदेव गुंजाळ, केशव जाधव, एस.टी. देशमुख, आर.बी. सोनवणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.धनवंती काळोखे व मयुरी गाडे यांनी केले. प्राचार्य डॉ. संजय चौधरी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)