मी चित्रपट इंडस्ट्रितल्या राजकारणाचा बळी
By Admin | Published: March 20, 2016 11:09 PM2016-03-20T23:09:21+5:302016-03-20T23:15:04+5:30
विनोद गोळे, पारनेर मंगेश हाडवळे यांनी मला हिरो केले़ पण त्यानंतर चित्रपट क्षेत्रातील अनेकांनी मला अभिनय क्षेत्रात प्रवेशच मिळू नये, यासाठीच प्रयत्न केले.
विनोद गोळे, पारनेर
मंगेश हाडवळे यांनी मला हिरो केले़ पण त्यानंतर चित्रपट क्षेत्रातील अनेकांनी मला अभिनय क्षेत्रात प्रवेशच मिळू नये, यासाठीच प्रयत्न केले. चित्रपट क्षेत्रातील राजकारणाचा ग्रामीण भागातील कलाकारांना फटका बसतो, अशी खंत देशाचा सर्वाेच्च राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेल्या शरद गोयेकर याने व्यक्त केली़
शरद गोयेकर याने ‘लोकमत’शी बोलताना ही खंत व्यक्त केली़ चित्रपट क्षेत्रातील अनेक कटू व चांगले प्रसंगही त्याने कथन केले. आठ वर्षापूर्वी टिंग्या चित्रपटातून गोयेकरची या झगमगत्या दुनियेत एन्ट्री झाली़ मात्र, त्यानंतर शरद गोयेकर पुढे एकाही चित्रपटात दिसला नाही़ सध्या तो अकरावीत शिक्षण घेत आहे़ अत्यंत प्रतिकुल परिस्थीवर मात करीत टिंग्या उर्फ शरद गोयेकरने दिग्दर्शन क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे. सर्वांत लहान दिग्दर्शक अशी नवी ओळख त्याला आता मिळाली आहे़
शरद गोयेकर पारनेर तालुक्यातील ढवळपुरीचा रहिवाशी. आठ वर्षांपूर्वी राजुरी (जि. पुणे) येथील दिग्दर्शक मंगेश हाडवळे याने पाचवीत शिक्षण घेणाऱ्या शरदला घेऊन टिंग्या हा चित्रपट बनविला आणि उत्कृष्ट अभियनाचा राष्ट्रीय बालकलाकार म्हणून गौरवही झाला. त्यानंतर त्याला अनेक सन्मान मिळाले. त्याची राज्यात टिंग्या म्हणूनच ओळख आहे. परंतु अभिनय क्षेत्रात पुरस्कार मिळवूनही टिंग्या चित्रपट क्षेत्रातून दूर कसा राहिला, यासह दिग्दर्शनातील भूमिकाही ‘लोकमत’शी बोलताना शरदने उघड केली. पाचवीला असताना टिंग्याने मला लोकप्रियता मिळवून दिली. त्यात झोपडीत राहणाऱ्या माझ्या आई, वडिलांना चार भिंतीचे घर रहायला मिळाले, हा त्यावेळचा आनंद ठरला. नंतर मला शिक्षणासाठी दत्तक घेणाऱ्या पाटील यांनी शरद गोयेकर नाव बदलून मोहित प्रकाश पाटील असे नाव बदलण्यास सांगितले. मी त्यास नकार दिला आणि तेथूनच माझ्या अभिनय क्षेत्रात अडचणी निर्माण झाल्या असे सांगताना फॅँड्रीसह अनेक पुरस्कारप्राप्त बालकलाकारांना पुढे चित्रपटात का घेतले नाही, असा सवालही त्याने केला. बब्या या चित्रपटाचे ढवळपुरी, आळेफाटा, साकूर, बेल्हा या भागात पन्नास टक्के चित्रीकरण पूर्ण झाले असल्याचे त्याने सांगितले.
बालपण हरवलं
टिंग्या म्हणून हिरो झाल्यावेळेस मी फक्त पाचवीत होतो, नंतर मी पुणे येथे वसतिगृहात राहून शिक्षण घेत होतो. त्यानंतर आलेल्या अनेक अडचणींमुळे मला बालपणाचा आनंदच घेता आला नाही. मी माझे बालपण हरवून बसलो, अशी व्यथा शरद गोयेकरने व्यक्त केली.