राष्ट्रवादीच्या मुंबईत आज मुलाखती
By admin | Published: August 26, 2014 11:09 PM2014-08-26T23:09:12+5:302014-08-26T23:20:59+5:30
अहमदनगर: आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी निश्चितीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत बुधवारी होत आहे.
अहमदनगर: आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी निश्चितीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत बुधवारी होत आहे. मुलाखतीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती यावेळी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी दिली.
गत आठवड्यात पक्षाने इच्छुकांचे अर्ज मागविले होते. जमा झालेले अर्ज प्रदेश समितीकडे पाठविण्यात आले आहे. दि. २७ रोजी शरद पवार हे स्वत: उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. जिल्ह्यातून ६२ जणांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. या सर्वच इच्छुकांना पक्षाने मुलाखतीसाठी मुंबईत बोलविले आहे. पक्षाचे जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार तसेच ज्येष्ठ नेत्यांनाही मुंबईतील बैठकीसाठी बोलविण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग हेही मुलाखतीप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. माजी मंत्री शंकरराव कोल्हे, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनाही मुंबईत बोलविण्यात आले आहे.
बबनराव पाचपुते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पूर्वीच पक्षातून गेलेले घनशाम शेलार यांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. तेही मुलाखतीसाठी जाणार आहे. पाचपुते यांच्या पराभवासाठी पवार यांनी श्रीगोंदा मतदारसंघातील नेत्यांची पुण्यात बैठक घेतली होती. मुंबईतही पाचपुते यांच्याविषयी बैठकीत चर्चा केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली. कॉँग्रेसच्या ताब्यातील नगर शहर व कर्जत-जामखेड मतदारसंघावर राष्ट्रवादीने हक्क सांगितला आहे. या मतदारसंघातून इच्छुकांना मुलाखतीला बोलविले आहे. त्यामुळे मतदारसंघ अदलाबदलीच्या विषयीही मुलाखतीनंतरच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रवादी-कॉँग्रेसमध्ये जागा वाटपात असलेले मतभेद अजूनही मिटलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका काय? याची चाचपणी मुलाखतीनंतर केली जाणार आहे. त्यासाठीच पवार यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांना मुंबईत बोलविले आहे.