महापौरांना प्रतिवादी करा
By admin | Published: August 10, 2016 12:02 AM2016-08-10T00:02:07+5:302016-08-10T00:25:30+5:30
अहमदनगर : महापालिकेतील गटनेतेपदाच्या वादासंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने महापौर सुरेखा कदम यांनाच प्रतिवादी करा, असे आदेश याचिकाकर्त्यांना दिले आहेत.
अहमदनगर : महापालिकेतील गटनेतेपदाच्या वादासंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने महापौर सुरेखा कदम यांनाच प्रतिवादी करा, असे आदेश याचिकाकर्त्यांना दिले आहेत. याबाबत पुढील सुनावणी आता २२ आॅगस्टला होणार आहे. या सुनावणीला महापौरांनी प्रत्यक्ष हजर राहण्याचेही निर्देश खंडपीठाने दिले आहेत.
महापालिकेतील स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर सर्व प्रक्रिया बेकायदेशीर असल्याने या प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी औरंगाबाद खंडपीठात केली होती. त्यावर खंडपीठात मंगळवारी सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्यावतीने नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारस्कर, अॅड. प्रसन्ना जोशी आदी उपस्थित होते. गटनेते पदाच्या नियुक्त्या बेकायदेशीर केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. याचिकाकर्त्यांनी नगरसचिव, आयुक्त, राज्य शासन यांना प्रतिवादी केले होते. मात्र सदर नियुक्त्या महापौरांनी केल्या असल्याने त्यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले नसल्याचे खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावरील पुढील सुनावणी २२ आॅगस्टला होणार आहे.
(प्रतिनिधी)
नगरसचिव मिलिंद वैद्य यांना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनीच पळविले असल्याच्या अफवा शहरात सुरू होत्या, तर कोणीही पळविले नसल्याचे वैद्य यांचे म्हणणे आहे. दरम्यान, नगरसचिव यांना ताब्यात घेवून पाहिजे तशी पत्रे लिहून घेण्याचा दणका महापालिकेत सुरू आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या वैद्य यांना महापालिकेत येणे नकोसे झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील स्पर्धेमुळे पळवापळवीच्या अफवा सोडून देत एकमेकांचा कार्यभाग साधून घेतला जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले, मात्र अशी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.