राजकीय वादात नगरसचिवांची उचलबांगडी
By admin | Published: August 11, 2016 01:08 AM2016-08-11T01:08:26+5:302016-08-11T01:11:46+5:30
अहमदनगर : सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील गटनेते नियुक्तीच्या राजकीय वादात महापालिकेचे नगरसचिव मिलिंद वैद्य यांची अखेर नगरसचिवपदावरून उचलबांगडी करण्यात आली.
अहमदनगर : सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील गटनेते नियुक्तीच्या राजकीय वादात महापालिकेचे नगरसचिव मिलिंद वैद्य यांची अखेर नगरसचिवपदावरून उचलबांगडी करण्यात आली. दरम्यान, वैद्य यांनी जाता जाता सुवेंद्र गांधी (भाजप), संपत बारस्कर (राष्ट्रवादी) आणि सुवर्णा कोतकर (काँग्रेस) यांची नियुक्ती करून गटनोंदणीच्या वादाला आणखी फोडणी दिली आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी झालेल्या विशेष सभेत गटनेतेपदावरून गोंधळ झाला होता. तसेच पक्षीय बलाबलाचाही वाद उपस्थित झाला होता. याच गोंधळात महापौरांनी शिवसेनेला साथ देणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांची स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. याविरोधात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. संबंधित पक्षाच्या नगरसेवकांचा दबाव असल्याने स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती करण्याच्यावेळी एकाच रात्रीतून गटनेते बदलण्याचा चमत्कारही वैद्य यांनी केला. नाशिक विभागीय आयुक्तांनी नव्याने गटनोंदणी होत नसल्याचे पत्र महापालिकेला पाठविले, मात्र ते पत्रच वैद्य यांनी गायब केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या पत्रासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी त्यांना पळविले होते. विभागीय आयुक्तांचे पत्र मिळाल्यानंतर वैद्य यांनी संपत बारस्कर, सुवर्णा कोतकर, सुवेंद्र गांधी हेच गटनेते असल्याचे त्यांना पत्र दिले आहे. दरम्यान, गटनेते निवडण्याचा अधिकार नगरसचिवांना नसून गटनेता निवडीचे अधिकार संबंधित पक्षाला असतानाही नव्या गटनेत्यांना नियुक्तीचे पत्र दिल्याने पुन्हा राजकीय वाद रंगण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, वैद्य यांच्या ताब्यातील आवक-जावक रजिस्टरही पळविले होते. याबाबत वरिष्ठांना माहिती न देणे, कार्यालयातून गायब होणे, मोबाईल बंद ठेवणे अशा प्रकारे कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आयुक्तांनी त्यांना कारणे दाखवा नोटिसही बजावली होती.
या राजकीय वादामुळे वरिष्ठ अडचणीत आले होते. त्यामुळे वैद्य यांची नगरसचिवपदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी सावेडीचे प्रभाग अधिकारी एस. बी. तडवी यांची नियुक्ती करण्यात आली. वैद्य यांची माळीवाडा विभागाचे प्रभाग अधिकारी म्हणून तात्पुरती बदली करण्यात आली आहे. सावेडीचे प्रभाग अधिकारी म्हणून जितेंद्र सारसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपायुक्त अजय चारठाणकर यांनी बदलीचे आदेश दिले असून त्याला आयुक्तांनी मान्यता दिली आहे. वैद्य यांच्या बदलीमुळे तडवी आणि सारसर यांचीही बदली करावी लागली.