साई संस्थान पुन्हा ‘अॅक्टीव्ह’, आषाढी निमित्त अडीचशे क्विंटलची खिचडी
By Admin | Published: July 15, 2016 05:30 PM2016-07-15T17:30:01+5:302016-07-15T18:14:33+5:30
पाण्याची उपलब्धता झाल्याने साईसंस्थानच्या सर्व सेवा पुर्ण क्षमतेने पुन्हा कार्यरत झाल्या असुन भाविकांनी गुरूपौर्णिमा उत्सवात सहभागी होवुन आत्मिक आनंद मिळवावा
>ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. १५ - पाण्याची उपलब्धता झाल्याने साईसंस्थानच्या सर्व सेवा पुर्ण क्षमतेने पुन्हा कार्यरत झाल्या असुन भाविकांनी गुरूपौर्णिमा उत्सवात सहभागी होवुन आत्मिक आनंद मिळवावा असे आवाहन संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी केले आहे़
दरम्यान साईसंस्थान मध्ये आज आषाढी एकादशीच्या उपवासा निमीत्ताने अडीचशे क्विंटलची खिचडी बनवण्यात आली़ यात नास्ता व जेवणासह जवळपास ऐंशी हजार भाविकांनी फराळाचा लाभ घेतल्याचेही शिंदे यांनी सांगितले़
गेल्या तीन चार महिन्यांपासुन पाणी टंचाईने शिर्डीला घेरले होते़ महिनाभरापासुन तर संस्थान व नगरपंचायतचे साठवण तलाव पुर्ण कोरडे पडले होते़ यामुळे संस्थानवर भक्तनिवास,दोन्ही उप प्रसादालये बंद ठेवण्याची दुर्देवी वेळ आली होती़ मुख्य प्रसादालयातही पत्रावळीवर भोजन देण्यात येत होते़ धरण क्षेत्रावर पाऊस होवुन पाणी सुटले नाही तर गुरूपौर्णिमा उत्सवात काय करायचे असा यक्ष प्रश्न संस्थान पुढे निर्माण झाला होता़ दरम्यान कालव्यांना पाणी सुटून दोन दिवसांपुर्वी संस्थान तलावात पाण्याची आवक सुरू झाली़ यामुळे संस्थानने तत्काळ सर्व भक्तनिवास व प्रसादालये सुरू करण्याचा निर्णय घेतला़
आषाढी एकादशी निमीत्त परंपरे प्रमाणे संस्थान प्रसादालयात आज तब्बल अडीचशे क्विंटलची साबुदाणा खिचडी बनवण्यात आली़ यात ८० क्विंटल साबुदाणा, ४१ क्विंटल शेंगादाणा, १२़७५ क्विंटल तुप, २२़ ८० क्विंटल बटाटा, ६० किलो भगर आदीचा समावेश होता़ सकाळी ३१ हजार ३५१ नास्ता पाकीटांची विक्री झाली़ या प्रत्येक पाकीटाची किंमत पाच रूपये आहे़ यानंतर दुपार पर्यंत साडे सोळा हजार भाविकांनी फराळ प्रसादाचा लाभ घेतला़ रात्री उशीरापर्यंत हा आकडा पंचेचाळीस हजारा पर्यंत जाण्याची शक्यता प्रसादालय प्रमुख विष्णु थोरात यांनी व्यक्त केली़ आज एका भाविकाने एक लाख रूपये अन्नदानासाठी दिल्याने यातुन सकाळी प्रथम आलेल्या दहा हजार भाविकांना मोफत फराळ प्रसाद देण्यात आला़. (तालुका प्रतिनिधी)