साईनगरीत साई स्तवनमंजिरीची पारायणे
By Admin | Published: August 11, 2016 01:06 AM2016-08-11T01:06:43+5:302016-08-11T01:10:33+5:30
प्रमोद आहेर, शिर्डी साईसमाधी शताब्दीच्या अनुषंगाने विकास कामांना अद्यापही सुरूवात झाली नसली तरी ग्रामस्थांनी मात्र शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यांचा श्रीगणेशा केला आहे़
प्रमोद आहेर, शिर्डी
साईसमाधी शताब्दीच्या अनुषंगाने विकास कामांना अद्यापही सुरूवात झाली नसली तरी ग्रामस्थांनी मात्र शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यांचा श्रीगणेशा केला आहे़
संतकवी दासगणु महाराजांनी बाबांच्या हयातीतच लिहिलेल्या साई स्तवन मंजिरीचे दर गुरूवारी सामुदायिकरित्या साप्ताहिक पारायण होत आहे़ या माध्यमातून शताब्दीच्या अखेरपर्यंत स्तवन मंजिरीची १५१ आवर्तने पूर्ण होणार आहेत़
गुरूवार, दि़ ७ जानेवारी २०१६ रोजी समाधी मंदिराच्या उत्तरेस असलेल्या सरंजाम बागेच्या जागेत नगराध्यक्षा अनिता विजय जगताप, संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला़ ११ आॅगस्ट रोजी या उपक्रमाला बत्तीस आठवडे पूर्ण होत आहेत़
सार्इंची प्रार्थना करण्याची सोपी व प्रभावी साधना म्हणून विविध भाषेत अनुवादीत झालेल्या साईस्तवन मंजिरीला जगभरातील साईभक्तांमध्ये मान्यता आहे़ आपल्या आयुष्यात एकदाच येणारा हा ऐतिहासिक समाधी शताब्दी सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी राजेंद्र सुभाष कोते, प्रमोद गोंदकर, सर्जेराव कोते, कमलाकर कोते, राहुल गोंदकर व अमोल गायके यांच्या संकल्पनेतून साई स्तवन मंजिरीच्या साप्ताहिक सामुदायिक वाचनाची मुहूर्तमेढ रोवली गेली़
प्रत्येक गुरूवारी सायंकाळी पावणे सात वाजता शहरातील एखाद्या ठरलेल्या भाविकाच्या घरी स्तवन मंजिरीचे सामुदायिक वाचन सुरू होते़
अर्ध्या तासाच्या वाचनानंतर शिर्डी माझे पंढरपूर व अन्य आरत्यांनी कार्यक्रमाची सांगता होते़ ज्याच्याकडे कार्यक्रम आहे तो भाविक उपस्थितांना यथाशक्ती चहा, फराळ किंवा जेवण देतो, अर्थात हा ऐच्छिक भाग असतो़
कार्यक्रमातच पुढील आठवड्याचा यजमान ठरतो़ यानंतर प्रमोद गोंदकर आठवडाभर प्रसिद्धीची जबाबदारी पार पाडतात़ कार्यक्रमाच्या दुपारी आयोजकांच्या वतीने सार्इंची प्रतिमा, साऊंड सिस्टीम व स्तवन मंजिरीची पुस्तके पोहच केली जातात़ सायंकाळी आयोजक तसेच डॉ़ धनंजय जगताप, माधुरी राजेंद्र शिंदे, वैशाली वसंत गोंदकर, रूपाली सचिन तांबे, रूपाली सोमनाथ शेळके आदींसह उपक्रमाचा भाग बनलेले शंभर स्त्री-पुरूष वाचक कार्यक्रमस्थळी जातात़ तेथे परिसरातील दोन-तीनशे भाविक उपस्थित असतात़
संस्थानचे प्रमुख पुजारी बाळासाहेब जोशी व ग्रामजोशी वैभवशास्त्री रत्नपारखी यांच्या पौरोहित्याखाली साईस्तवन मंजिरीचे सामुदायिक पठण होते़ कार्यक्रमानंतर साईप्रतिमा पुढील कार्यक्रमापर्यंत त्याच यजमानाच्या घरी असते़ तो त्या प्रतिमेची रोज पूजाअर्चा करतो़ हा कार्यक्रम आपल्या घरी घेण्यासाठी चढाओढ लागलेली असते़