शिवसेनेच्या मंत्र्यांचे काम चांगले
By admin | Published: April 23, 2016 11:38 PM2016-04-23T23:38:02+5:302016-04-23T23:44:51+5:30
अहमदनगर : राज्यातील सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांचे काम चांगले आहे. सत्तेत असो की विरोधात, जनतेचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे.
अहमदनगर : राज्यातील सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांचे काम चांगले आहे. सत्तेत असो की विरोधात, जनतेचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. सत्तेपेक्षा शिवसेना आता जनतेच्या प्रश्नांसाठी काम करीत आहे,असे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
पूर्णवाद परिवारातर्फे ठाकरे यांना शनिवारी पारनेर येथे युवक क्रांतीवीर पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. शाल आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर राज्यात शिवसेनेची सत्ता आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ठाकरे म्हणाले, राज्यात युतीची सत्ता असली तरी शिवसेनेच्या मंत्र्यांचे काम चांगले आहे. फक्त शिवसेनेच्याच मंत्र्यांचे काम चांगले आहे का? यावर त्यांंनी मौैन बाळगले. ते म्हणाले. आम्ही फक्त काम करतो. पारनेर येथे फक्त आशीर्वाद घेण्यासाठीच आलो आहे. लोकांचे प्रश्न घेऊन शिवसेना काम करीत आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणे अजिबात गैर नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना लढते आहे,विरोधक म्हणून नव्हे. आंदोलनातून जनतेची भूमिका मांडत आहोत.
सत्काराला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, मी कोणतेही काम केलेले नाही, ज्यामुळे हा पुरस्कार दिला गेला आहे. पुरस्काराने काम करण्याची जबाबदारी वाढली आहे. जगातील सर्व क्रांती, संशोधन १५ ते २५ या वयोगटातील तरुणांनीच केल्या आहेत. आई-वडील-आजोबा आणि शिवसैनिक यांच्याशिवाय मी शून्य आहे. अन्न-पाणी-पर्यावरणावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. आगामी काळात पाण्यावरून महायुद्ध होऊ शकते. मराठवाडा-विदर्भात दुष्काळ मोठा आहे. तिथे पाणी कसे पोहचवायचे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अन्न-पाणी कसं वाचविले पाहिजे, याचे धडे अभ्यासक्रमात असायला पाहिजेत. मुंबईजवळील जव्हार गावात पाहणी केली. तिथे मोबाईल पोहोचला आहे. फेसबुक पोहोचले आहे, मात्र पाणी पोहोचलेले नाही. आपण नेमके काय वाचवतोय, तेच कळत नाही. सामाजिक जबाबदारी म्हणून शिवसेनेने जालना, औरंगाबाद येथे अनेक मुला-मुलींची लग्नं लावून दिली. आता बीडमध्ये लग्नसोहळा होत आहे. काम करीत असताना ग्राऊंडलेवलवरून फीडबॅक हवा आहे. नाहीतर परिस्थिती बिघडते. पाण्यासाठी संचारबंदी कधी पाहिली नव्हती. म्हणून भारतीय संस्कृतीनुसार पंचमहाभूतांची पूजा करण्याच्या संस्कृतीचे जतन झाले पाहिजे.
(प्रतिनिधी)