विश्वस्त मंडळ सरकारच्या की भाविकांच्या इच्छापूर्तीसाठी?
By admin | Published: August 12, 2016 11:52 PM2016-08-12T23:52:54+5:302016-08-12T23:57:01+5:30
प्रमोद आहेर, शिर्डी शताब्दीच्या पार्श्वभूमीवर संस्थान विश्वस्तांनी सरकारच्या अगोदर भाविकांच्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्न केले तरच नैतिकदृष्ट्या सार्इंचे विश्वस्त म्हणवून घेता येइल़
प्रमोद आहेर, शिर्डी
शताब्दीच्या पार्श्वभूमीवर संस्थान विश्वस्तांनी सरकारच्या अगोदर भाविकांच्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्न केले तरच नैतिकदृष्ट्या सार्इंचे विश्वस्त म्हणवून घेता येइल़ भाविकांच्या श्रद्धेचा उपयोग सामाजिक कामासाठीच व्हायला हवा, मात्र त्यांच्या श्रद्धेचा आदर ठेवून अशी सर्वसामान्याची अपेक्षा आहे़
शासनाला वैद्यकीय कामांसाठी निधी देण्यापेक्षा सार्इंचा वारसा चालवणारा रूग्णसेवेचा आणखी विस्तार करून मेडिकल, नर्सिंग महाविद्यालये, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे महाविद्यालय सुरू करणेही सरकारला मदत केल्यासारखेच आहे़
पाचशेवर खाटा असलेल्या संस्थान रूग्णालयाची कितीही अबाळ झाली असली तरी जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भ, मराठवाड्यातील गोरगरीब रूग्णांसाठी हा हक्काचा आधार आहे़ गेल्या वर्षी संस्थान रूग्णालयात ४ लाख ४६ हजार रूग्णांवर उपचार झाले, पंचवीस हजार रूग्ण अॅडमीट झाले, २० हजार ४४२ रूग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या़ सुपरस्पेशालीटीच्या रूपाने कार्डीयाक व न्युरो विभागात गेल्या दहा वर्षात एक लाखाहून अधिक रूग्णांवर माफक दरात उपचार झाले़ रूग्णालयावर गेल्या वर्षी संस्थानने ९१ कोटी रूपये खर्च केले़ अन्य ठिकाणी उपचार घेणाऱ्या ४७,६५५ गरीब रूग्णांना ७ कोटी ३१ लाखांची वैद्यकीय मदत केली़
संस्थानच्या २ हजार ८७१ खोल्या, हॉलचा वर्षभरात ५९ लाख २४ हजार तर प्रसादालयात १ कोटी ३० लाख भाविकांनी लाभ घेतला़ वर्षभरात तीन कोटीहून अधिक भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या पंचवीस टक्के इतकी ही संख्या व त्यांच्या सुविधा, भावना दुर्लक्षित करता येणार नाहीत़
दर्शन सुविधेचा वाईट अनुभव आलेल्या सुरेश हावरे यांनी तीन वर्षापूर्वी शिर्डीला पुन्हा न येण्याचा निर्धार केला होता. अन्य भाविकांची अशा कटू अनुभवातून सुटका व्हावी, याकरताच कदाचित त्यांना साईकृपेने अध्यक्ष पदाची संधी मिळाली असेल़ त्यांनी आता भाविकांचे दर्शन व वास्तव्य कसे आनंददायी होईल यावर लक्ष द्यायला हवे़
उन्हाळ्यात पाण्याअभावी भक्तनिवास बंद ठेवले, भाविक पत्रावळीवर जेवले, दर्शनरांगेत उन्हातान्हात भाविक लेकराबाळांना घेऊन उभा असतो, मान्यतेअभावी मंदिर परिसरातील फरशी बदलता येत नाही, शहरातील रस्ते अर्धवट आहेत, स्वच्छतागृहे नाहीत, अनेक प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत याबाबत संस्थानकडे पैसे मागणारांना काही करावसं वाटत नाही़ (समाप्त)
संस्थान रूग्णालय गोरगरिबांसाठी वरदान आहे, ते अद्ययावत करायचे सोडून सरकारला आरोग्यासाठी निधी देणे दुर्दैव आहे, शिर्डी ग्रामस्थांचा याला विरोध असेल, याबाबत व्यवस्थापनाला जाब विचारू़
-कैलास कोते,
माजी नगराध्यक्ष, माजी विश्वस्त़
सरकार भक्तांचा पैसा लुटण्याच्या प्रयत्नात आहे़ सरकारने जनतेच्या कामांसाठी शासकीय पैसा वापरावा, भक्तांच्या पैशाची आम्ही लूट करू देणार नाही़
-दत्तात्रय कोते,
मनसे जिल्हाध्यक्ष़