श्रीरामपुरातील दोनशे जणांचे स्थलांतर

By admin | Published: August 4, 2016 12:19 AM2016-08-04T00:19:30+5:302016-08-04T00:24:23+5:30

श्रीरामपूर : गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे श्रीरामपूर तालुक्यातील नदीकाठच्या दहा गावांमध्ये पाणी शिरले असून शेकडो एकर पिके पाण्याखाली गेली आहेत.

Twenty hundred people migrated from Shrirampur | श्रीरामपुरातील दोनशे जणांचे स्थलांतर

श्रीरामपुरातील दोनशे जणांचे स्थलांतर

Next

श्रीरामपूर : गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे श्रीरामपूर तालुक्यातील नदीकाठच्या दहा गावांमध्ये पाणी शिरले असून शेकडो एकर पिके पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठच्या गावातील दोनशे लोकांना महसूल प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे. सरला बेटाला गोदावरीच्या पाण्याचा वेढा बसला आहे. बेटाचे महंत रामगिरी महाराज यांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी जाण्याची विनंती केली मात्र त्यांनी ती फेटाळून लावत बेटावरच थांबणे पसंत केले आहे. महाराजांसोबत जवळपास ४० लोक सरला बेटावर सुरक्षित असल्याची माहिती तहसीलदार अश्विनकुमार पोतदार यांनी दिली.
महाकांळ, वडगाव, गोवर्धन, मातुलठाण, खानापूर, भामाठाण, नाऊर आदी गावांच्या गावठाणात पाणी शिरले असून या गावातील नदीकाठची शेतपिके पाण्याखाली गेली आहेत. कमालपूर, नाऊर येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे.
नदीपात्र सोडून पुराचे पाणी शेतात पसरले आहे. नदीला पूर येणार असल्याची कल्पना अगोदरच असल्याने तालुका प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी रवाना केले आहे. तहसीलदार पोतदार हे स्वत: दिवसभर नदीकाठच्या गावांना भेटी देत होते.
पुराच्या पाण्याखाली नेमके किती हेक्टर क्षेत्र गेले याची निश्चित माहिती नसून पूर ओसल्यानंतर ते नेमके समजू शकेल असे तहसीलदार पोतदार यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
महानुभाव आश्रमातील २५ जण सुरक्षित बाहेर
कमालपूर येथील नदीकाठी असलेल्या महानुभाव पंथीय छिन्नस्थली मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून मंदिराचे मठाधिपती संतमुनी नागराज बाबा कपाटे यांच्यासह २५ जण मंदिरात अडकून पडले. नगरचे प्रांताधिकारी वामन कदम, नेवाशाचे तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी बोटीच्या सहाय्याने या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. सरपंच भास्कर मुरकुटे यांनी प्रशासनाला सहकार्य केले.
नाऊरच्या ५० घरांचा संपर्क तुटला
श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर गावातील शिंदे, नागल व देसाई कुटुंबाची ५० घरे ही सावखेड रस्त्यावर नदीपल्याड वस्ती करून राहतात. पुराचे पाणी जुन्या गंगेतून फिरल्याने ही कुटुंब तेथेच अडकून पडली आहेत. पाण्याचा त्यांना कोणताही धोका नाही, मात्र इतर गावांशी त्यांचा संपर्क एकदम तुटला आहे. नाऊर गावातील सुमारे ५०० एकर पिके पाण्याखाली गेले. किशोर भास्कर आहिरे, अशोक आहिरे यांची वस्ती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. त्यांचा कांदाही पाण्याखाली गेला आहे. गावातील राशीनकर, गहिरे, शिंदे, नाणेकर या कुटुंबातील घरात पाणी घुसले. भाजपचे प्रकाश चित्ते, राष्ट्रवादीचे सिध्दार्थ मुरकुटे यांनी पाहणी केली.
‘त्या’ शेतकऱ्याचा मृतदेह सापडला
ब्राह्मणवाडा : कन्हेर ओहळ (करवंदरा) येथे मंगळवारी (दि. २) सायंकाळी वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह बुधवारी सकाळी सापडला. मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास राजाराम महादू गायकर हे आपल्या घरी परतत असताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेले होते. रात्री उशिरापर्यंत शोध घेवूनही त्यांचा शोध लागला नव्हता. स्थानिक नागरिकांनी पुन्हा शोध घेवून मृतदेह वर काढला.
ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतीचे ते माजी सदस्य होते. शेतकरी राजाराम गायकर यांच्या मागे पत्नी,आई-वडील व मुले असा परिवार आहे.
आॅपरेशन आॅन गोदावरी
अहमदनगर: नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून मंगळवारी दुपारी जेमतेम दीड लाख विसर्ग होता़ बुधवारी पहाटे अडीच लाख क्युसेक वेगाने विसर्ग सुरू झाल्याने एकच धावपळ उडाली़ विसर्गात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने रात्रीतून १ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले होते़ पहाटेपासून महसूल प्रशासनाने गोदाकाठी ठिकठिकाणी रेस्क्यू आॅपरेशन हाती घेतल्याने बुधवारी दुपारपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली़
अधिकारी तळ ठोकून
गोदावरीतील विसर्ग मंगळवारी दिवसभरात वाढू लागल्याने प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी जिल्ह्यातील नदीकाठच्या कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता आणि नेवासा तालुक्यात सतर्कतेचे आदेश देत आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय केले़ कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार प्रशांत खेडेकर यांच्यासह पथक डाऊच बेटावर दाखल झाले़ तर श्रीरामपूर तहसीलदार सतीष पोतदार नदीकाठी तळ ठोकून होते़ नेवासाचे तहसीलदार नामदेव टिळेकवर व प्रांत अधिकारी वामन कदम यांनी घोगरगाव व जैनपूर येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले़
जिल्हाधिकारी कार्यालयातही धावपळ
नदीकाठच्या ठिकठिकाणच्या गावांतील पूर परिस्थितीचा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख डॉ़ बडधे दिवसभर आढावा घेत होते़ पाटील यांच्यासह अधिकारी बुधवारी पहाटेच कार्यालयात दाखल झाले़ बुधवारी दिवसभर पूर परिस्थितीचा आढावा घेऊन मंत्रालयात कळविण्याची लगबग सुरू होती़
मुळा धरण ७५ टक्के भरले
राहुरी : मुळा धरणात बुधवारी सायंकाळी ६ वाजता १९ हजार ६२३ दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची नोंद झाली़ धरणाकडे ४० हजार ८२० क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे़
भंडारदरा ९२ टक्के
राजूर : भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोटासह अकोले तालुक्यात बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कमी झाला. भंडारदरा पाणलोटातील रतनवाडी येथे सकाळी संपलेल्या चोवीस तासांत साडे तेरा इंच म्हणजेच ३३७ मि.मी पाऊस पडला. दिवसभराच्या १२ तासात बुधवारी अवघे ३४४ द.ल.घ.फू पाणी धरणात येत भंडारदरा धरण सुमारे ९२% भरले. पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण केव्हा भरणार याची उत्सुकता वाढीस लागली आहे. दरम्यान निळवंडे धरण सायंकाळी ५५% भरले.

 

Web Title: Twenty hundred people migrated from Shrirampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.