निधीअभावी ‘अटल अर्थसहाय्य’ रखडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:17 AM2021-05-30T04:17:01+5:302021-05-30T04:17:01+5:30
अकोला : सहकारी संस्थांच्या व्यावसायिकतेला चालना देत शेतीपूरक उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी सहकार विकास महामंडळाने अटल पणन अर्थसहाय्य योजना जाहीर ...
अकोला : सहकारी संस्थांच्या व्यावसायिकतेला चालना देत शेतीपूरक उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी सहकार विकास महामंडळाने अटल पणन अर्थसहाय्य योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ३४ संस्थांनी नोंदणी केली आहे. मात्र, तीन वर्षे होऊनही या योजनाला निधी मिळत नसल्याने योजना रखडली आहे.
मान्सूनपूर्व कामांना महावितरणने दिली गती
अकोला : दरवर्षी महावितरणकडून मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कार्य केली जातात. यामध्ये विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्ती यासह नियोजन करून इतर महत्त्वाची कामे केली जातात, असे महावितरणने स्पष्ट केले.
बियाणे मोफत पुरविण्याची मागणी
अकोला : यावर्षी कोरोना संकटामुळे प्रत्येकाचेच आर्थिक कंबरडे मोडले आहे. यातून शेतकरीही सुटला नाही. पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीसोबतच शेतकरी बियाणांची जुळवाजुळव करीत आहे. मात्र, आर्थिक कोंडीमुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बघता बियाणे यावर्षी मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे!
अकोला : कोरोनामुळे सर्वत्र दहशत आहे. अत्यावश्यक सेवेतील नागरिक आपली जबाबदारी पार पाडत आहेत. यातील काहींना शासनाने विमा लागू केला आहे. त्याच धर्तीवर सरपंच, सदस्यांनाही विमा कवच लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आधारसाठी नागरिकांची चिंता
अकोला : सामान्य नागरिकांची ओळख असलेल्या आधार कार्ड काढण्यासाठी काही नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी लसीकरणासाठी आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांची चिंता वाढली होती; मात्र लॉकडाऊनमुळे सर्वच बंद असल्यामुळे नागरिकांचा नाईलाज आहे.
युवापिढी मोबाईलच्या नादी
अकोला : मागील वर्षीसारखाच यावर्षीही कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना घरीच रहावे लागत आहे. ऑनलाइन अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी आता पुन्हा मोबाईलच्या नादाला लागले आहेत. पुस्तकांचे वाचन करून ज्ञान मिळवावे, अशी पालकांची इच्छा आहे; मात्र युवापिढी मोबाईलच्या नादी लागल्याचे चित्र असून, पालकांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.