शाश्वत शेती विकासात कृषी विज्ञान केंद्रांचे योगदान
By Admin | Published: May 19, 2014 07:17 PM2014-05-19T19:17:58+5:302014-05-19T20:06:17+5:30
कृषी विज्ञान केंद्राच्या कृती आराखडा कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ दाणी यांचे प्रतिपादन.
अकोला : बदलत्या जागतिक आव्हानाचा सामना करताना विदर्भातील शेती व शेतकरी समृद्ध व त्यांच्यामध्ये ती क्षमता निर्माण करण्याचे काम करावे लागणार असून, कृषी विज्ञान केेंद्राचे शाश्वत शेती व कोरडवाहू तंत्रज्ञानाला भक्कम योगदान असले तरी, या तंत्रज्ञानचा प्रभाव या विज्ञान केंद्रांनी पडताळून पाहणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. रविप्रकाश दाणी यांनी सोमवारी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत विदर्भातील अकराही जिल्ह्यात कार्यरत कृषी विज्ञान केंद्राच्या कृती आराखडा कार्यशाळेचे उद्घाटन सोमवारी त्यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी डॉ. दाणी बोलत होते. या कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र विभागीय प्रकल्प संचालक डॉ. एन. सुधाकर, संशोधन संचालक डॉ. प्रदीप इंगोले, शिक्षण विस्तार संचालक डॉ. विजय माहोरकर, डॉ. व्ही.एम. भाले, डॉ. सी.एन. गांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. दाणी यांनी, कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार जिल्हापातळीवर करण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकर्यांना शेतीचे आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पुरविली जात असल्याचे सांगितले. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षात शेतकर्यांच्या शेेती करण्याच्या पद्धतीत तंत्रज्ञानाला अनुकूल बदल बघायला मिळत आहेत. शेतकर्यांना व्यावसायभिमुख करण्याचे प्रयत्नदेखील सुरू आहेत.
डॉ. सुधाकर यांनी विदर्भाच्या शेती विकासात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतीचे नव तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचविले जात आहे. त्यामुळे येणार्या काही वर्षात विदर्भातील शेती अधिक समृद्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी आम्ही सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
या कार्यशाळेला उपस्थित विदर्भातील १३ कृषी विज्ञान केंद्र्राच्या कार्यक्रम समन्वयकांनी कृषी विज्ञान केंद्राचा गतवर्षीच्या कामकाजाचा आढावा व यावर्षीचे नियोजन सादर केले.