जात पडताळणी समित्या बरखास्त करा! - आमदार रणधीर सावरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 13:55 IST2019-07-21T13:55:21+5:302019-07-21T13:55:28+5:30
अकोला: विद्यार्थी व नागरिकांसाठी त्रासदायक व डोकेदुखी ठरत असल्याने, राज्यातील जात पडताळणी समित्या बरखास्त करण्यात याव्या, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे शनिवारी केली.

जात पडताळणी समित्या बरखास्त करा! - आमदार रणधीर सावरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विद्यार्थी व नागरिकांसाठी त्रासदायक व डोकेदुखी ठरत असल्याने, राज्यातील जात पडताळणी समित्या बरखास्त करण्यात याव्या, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे शनिवारी केली.
राज्यातील मागासवर्गीयांना न्याय देण्यासाठी जात पडताळणी समित्या गठित करण्यात आल्या होत्या; परंतु या समित्या विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळण्याऐवजी त्रासदायक व डोकेदुखी ठरत आहे. तसेच नागरिकांना आर्थिक भुर्दंड व मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.
देशातील इतर राज्यात जात पडताळणी समित्या अस्तित्वात नसताना राज्यातही या समित्या नसाव्या, अशी मागणी आ. सावरकर यांनी केली आहे. गेल्या पाच वर्षात विद्यार्थी व मागासवर्गीयांना न्याय देण्यासाठी आपण अनेकदा जात पडताळणी कार्यालय गाठले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला; परंतु जात पडताळणी कार्यालयाच्या कामकाजामध्ये सुधारणा होत नाही.
कार्यालयात कायमस्वरूपी कर्मचारी, अधिकारी व समिती अध्यक्ष नसणे अशी अनेक कारणे सांगून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार अकोला जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र असल्याचे चित्र असून, नागरिकांना न्याय मिळण्याऐवजी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जात पडताळणीची कामे पूर्वीप्रमाणे महसूल विभागांतर्गत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे (महसूल) सोपविण्यात यावी, अशी मागणीही आ. रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांकडे केली आहे.
(प्रतिनिधी)