कृषी विभागाचे निविष्ठा तपासणी पथक गठित
By Admin | Published: May 19, 2014 07:18 PM2014-05-19T19:18:04+5:302014-05-19T20:21:44+5:30
आकोट तालुक्यात निविष्ठांच्या गुणवत्ता तपासणीसाठी पथक गठीत; कार्यवाहीस मात्र अद्याप प्रारंभ नाही.
आकोट : खरीप व रब्बी हंगामामध्ये तालुक्यातील कृषी सेवा केंद्राद्वारे शेतकर्यांना विक्री करण्यात येणार्या निविष्ठांच्या गुणवत्ता तपासणीसाठी शासकीय स्तरावर पथकाचे गठन करण्यात आले आहे. या पथकाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीस मात्र अद्याप प्रारंभ झालेला नाही.
तालुक्यातील कृषी सेवा केंद्रामार्फ त शेतकर्यांना निविष्ठा, खते, बियाणे, कीटकनाशके यांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा व विक्री होते; परंतु अनेकदा या निविष्ठा, बियाणे अथवा कीटकनाशके दर्जेदार नसल्याच्या असंख्य तक्रारी येतात; मात्र त्यावर काहीही कार्यवाही होत नसल्याने आणि शेतकरी एकटाच आपली लढाई लढत असल्याने शेतकर्यांचे अतोनात नुकसान होते. हंगामही निघून जातो आणि पैसाही निघून जातो. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडतो. त्याचबरोबर अनेक कृषी सेवा केंद्र चालक खतांची साठेबाजी करून चोरट्या मार्गाने व चढ्या दराने खताची विक्री करतात. त्यामुळेही शेतकर्यांची नाडवणूक होते. बरेच कृषी सेवा केंद्रचालक शासनाने बंदी घातलेल्या फवारणीच्या औषधांची सर्रास विक्री करतात. त्यामुळे उत्पादित मालाचा दर्जा घसरतो. अनेकदा कृषी सेवा केंद्रातून नेलेले बियाणे उगवतच नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. या सार्या बाबींवर वेळेपूर्वीच उपाययोजना करून शेतकर्यांना दिलासा मिळावा यासाठी बियाणे, खते, कीटकनाशके तथा अन्य निविष्ठांचा दर्जा तपासण्यासाठी कृषी संचालक पुणे यांनी प्रत्येक तालुकास्तरावर निविष्ठा गुणवत्ता तपासणी पथक गठित करून त्याद्वारे अनुचित प्रकारांवर अंकुश बसविण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार आकोट तालुक्यात असे पथक गठित करण्यात आले असून, या पथकाचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी अशोक साठी, सदस्य सचिव कृषी अधिकारी पंचायत समिती बी. टी. राठोड, सदस्य वजनमापे निरीक्षक तथा कृषी अधिकारी ए. आर. पांडे हे राहणार आहेत. बाजारात शेतकर्यांची बी-बियाणे खरेदीची लगबग सुरू झालेली आहे. सोयाबीन बियाण्यांचा मोठा तुटवडा भासणार आहे, अशा स्थितीत कृषी सेवा केंद्राद्वारे कोणतीही चलाखी होऊ न देण्यासाठी या पथकाने कार्यान्वित व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.