वाहनांवर मोबाईलचा सर्रास वापर
By admin | Published: May 19, 2014 07:18 PM2014-05-19T19:18:01+5:302014-05-19T20:45:20+5:30
चालत्या वाहनावर मोबाईल वापरावर बंदी; पण अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात या नियमांचे सर्रास उल्लघंन .
गांधीग्राम (अकोला): चालत्या वाहनावर मोबाईल वापरावर बंदी असली तरी ग्रामीण भागात सर्रास या नियमांचे उल्लघंन होत आहे. पोलिसांसमक्ष मोबाईलचा दुचाकीवर वापर होत असताना एकही कारवाई पोलिसांकडून होत नसल्याने मोबाईल वापर करण्यार्यांची हिंमत वाढली आहे. सध्या बहुतेकांकडे दुचाकी आणि मोबाईल या गोष्टी अनिवार्य झाल्या आहेत. परंतु दुचाकीस्वारांचे एका हाताने गाडीचा हँडल आणि एका हाताने मोबाईलवर बोलत गर्दीतही भरधाव गाडी चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक पोलिस विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणे धोक्याचे आहे. दुचाकी चालवताना मोबाईल वाजल्यास थांबून बोल असे घरच्यांकडून वारंवार सांगितल्या जाते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत वाहने चालविताना मोबाईलवर बोलणे वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा प्रकार शहरासह ग्रामीण भागातही वाढत आहे. आकोट-अकोला या वर्दळीच्या मार्गावरील गांधीग्राम, देवरी फाटा या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी असते. या मार्गाने काळीपिवळी, बस, ट्रक, दुचाकी आदी वाहने सुसाट धावतात. अशावेळी दक्षतेने वाहन चालवावे लागते. परंतु मोबाईलचा वाहनावर वापर होत असल्याने अनेक लहान-मोठे अपघात या मार्गावर घडत आहेत. जीवाला आणि दंडात्मक कारवाईलाही न घाबरणार्यांमध्ये तरुणाई आघाडीवर आहे. पण आपण दुसर्याच्या जीवाशी खेळत आहो, हे मात्र ते विचारात घेत नाहीत. एका हातामध्ये मोबाईल कानाला लावून हसत खेळत संवाद सुरू असतात. त्यामुळे केव्हाही तोल जाण्याची शक्यता असते. अशावेळी रस्ता गर्दीचा आहे, पाठीमागून कोणते वाहने येत आहे, याचाही अंदाज दुचाकीस्वार घेत नाही. खरे तर वाहन चालविताना मोबाईलवरून बोलणे म्हणजे गुन्हाच आहे. मात्र असा गुन्हा सर्रासपणे केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.