तूर डाळीचे किरकोळ दर १५0 रुपये प्रतिकिलो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2016 02:13 AM2016-02-01T02:13:40+5:302016-02-01T02:13:40+5:30
घाऊक आणि किरकोळ दरात प्रचंड तफावत, तुरीचे उत्पादन पन्नास टक्के घटले.
राजरत्न सिरसाट/अकोला: गतवर्षी पाऊस कमी झाल्याने इतर पिकांसह डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घटले असून, यातील जीवनसत्त्वयुक्त तूर डाळीचे उत्पादन विदर्भासह राज्यात सरासरी ५0 टक्क्यांच्यावर घटल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या डाळीचे दर पुन्हा वाढले असून, घाऊक बाजारात १२,५00 रुपये क्विंटलच्यावर, तर किरकोळ बाजारात दीडशे रुपये प्रतिकिलोच्या जवळपास दर आहेत. दरम्यान, घाऊक आणि किरकोळ दरात प्रचंड तफावत असल्याने सामान्य ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे. भारतात तूर या कडधान्याचे सर्वाधिक क्षेत्र हे महाराष्ट्रात आहे. मागील वर्षी ९३.२0 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. यावर्षी पावसाला विलंब झाल्याने तुरीचे लागवड क्षेत्र घटले असून, ते ८३.२४ लाख हेक्टरपर्यंत घसरले आहे. यावर्षी यात आणखी घसरण झाली आहे. तूर पीक मुख्यत: कोरडवाहू क्षेत्रात घेतले जाते. यावर्षी या पिकाचे उत्पादन २.७४ लाख टन अपेक्षित होते; पण यामध्ये प्रचंड घसरण झाली आहे. महाराष्ट्रात १0 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड होते. २0१३-१४ मध्ये हेक्टरी ८ क्विंटल ८१ किलो उत्पादन झाले; तथापि २0१५-१६ यावर्षी या उत्पादनात घसरण झाली असून, हेक्टरी केवळ ७00 किलो म्हणजे सात क्विंटलच्या आत उत्पादन झाले आहे. अपेक्षित हेक्टरी उत्पादन ११ क्विंटलच्या वर हवे होते; पण गतवर्षी ऐन फुलोरा, शेंगा येण्याच्या अवस्थेत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पावसाने दडी मारली होती. त्याचा फटका या पिकाला बसला आहे. परिणामी या डाळीचे किरकोळ बाजारातील दर आजमितीस दीडशे रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले. या दरवाढीचा सामान्यांच्या खिशावर ताण पडला आहे.