२० हजार हेक्टर बाधित
By admin | Published: March 2, 2016 12:48 AM2016-03-02T00:48:03+5:302016-03-02T00:48:03+5:30
जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे १९ हजार ६०५ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.
गारपिटीचा तडाखा : तीन दिवसांतील नुकसान, बाधित क्षेत्र वाढणार
अमरावती : जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे १९ हजार ६०५ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी रात्रीपर्यंत सुरू असलेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यात १० हजार ५७७ हेक्टरमधील पिके नेस्तनाबूत झाली आहेत. रबीचा हंगाम संपताना आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
यंदा खरिपाचा हंगाम अपुऱ्या पावसामुळे उद्ध्वस्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार रबी हंगामावर होती. सद्यस्थितीत जिल्ह्यात दीड लाख हेक्टरमधील रबीची पिकेसुस्थितीत असताना वादळी पाऊस व गारपिटीने ६ हजार ७६१ हेक्टर क्षेत्रातील गहू, २ हजार ७४४ हेक्टरमधील हरभरा, १ हजार ५६७ हेक्टरमधील भाजीपाला, ८ हजार ९३ हेक्टरमधील फळपिके व १४० हेक्टरमधील इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असलेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात ९ तालुक्यांमधील शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाच्या मदतीकडे डोळे लागले आहेत.
ंअंतिम अहवालाची प्रतीक्षा
अमरावती : यामध्ये अमरावती तालुक्यात १ हजार ५२७ हेक्टर, वरुड ३४ हेक्टर, चांदूरबाजार ३ हजार ८४४ हेक्टर, अचलपूर २ हजार १४३ हेक्टर, भातकुली १०७ हेक्टर, धामणगाव २ हजार ४७३ हेक्टर, चांदूररेलवे २८४ हेक्टर, तिवसा ८४ हेक्टर व चिखलदरा तालुक्यात ८० हेक्टर शेतीपिक व फळपिकांचे नुकसान झाले आहे.
सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे २३९ गावांमधील ६ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या ४ हजार २३२ हेक्टरमधील गहू, १ हजार ६४७ हेक्टरमधील हरभरा, ५ हेक्टरमधील कपाशी, ४६२ हेक्टरमधील भाजीपाला, ३ हजार ९०१ हेक्टरमधील फळपिके व ४५ हेक्टरमधील इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तीन दिवसांत चांदूरबाजार तालुक्यात सर्वाधिक ११ हजार ४५२ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक सर्वेक्षणाअंती १९ हजार ६०५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अहवाल असला तरी अंतिम अहवालात गारपिटीच्या नुकसानीची क्षेत्रवाढ होणार आहे. (प्रतिनिधी)