1 वर्षापासून गरिबांची 60 कुटुंब अंधारात, महावितरण विरोधात जनशक्तीचा प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 16:05 IST2022-08-29T16:02:53+5:302022-08-29T16:05:57+5:30
राज्यात, देशात एककीडे प्रगतीचे इमले चढवले जात असल्याचं सांगण्यात येतं

1 वर्षापासून गरिबांची 60 कुटुंब अंधारात, महावितरण विरोधात जनशक्तीचा प्रहार
अमरावती - शहरातील बिच्चू टेकडीच्या मागील बाजूस वीटभट्टी परिसरात राहणाऱ्या ५० ते ६० कुटुंबांना वीज नसल्यामुळे ते अंधारात आहेत. विशेष म्हणजे गेल्या एक वर्षांपासून ते विजेपासून वंचित असल्याने येथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात विद्युत महामंडळ डफरीन परिसरातील कार्यालयात नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले.
राज्यात, देशात एककीडे प्रगतीचे इमले चढवले जात असल्याचं सांगण्यात येतं. हे सरकार गोरगरिब आणि सर्वसामान्यांचं असल्याचं सांगितलं जातं. मात्र, तब्बल १ वर्षांपासून ६० कुटुंबात अंधार पसरल्याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही. म्हणून, प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लवकरात लवकर येथील नागरिकांना मीटर दिले नाही, तर महावितरणला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन दिला. तसेच मनोहर या अधिकार्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसांमध्ये विज मीटर न दिल्यास अधिकाऱ्यांच्या घरचे मीटर काढून ते प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने गरीब जनतेच्या घरी लावण्यात येईल असा इशाराही बंटी रामटेके यांनी दिला.