अमरावती लोकसभा; मतदान केंद्रांवर रांगा, दुपारी ३ पर्यंत ४३.७६ टक्के मतदान
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 26, 2024 15:57 IST2024-04-26T15:55:35+5:302024-04-26T15:57:49+5:30
Amravati : सकाळी ढगाळ, दुपारनंतर पारा ४० अंशावर, केंद्रांवरील नियोजन कोलमडले

Amravati Polling Booth
अमरावती : लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी दुपारी ३ पर्यंत ४३.७६ टक्के मतदान झाले. सकाळी ढगाळ वातावरण असल्याने नमतदारांमध्ये उत्साह होता. त्यानंतर ढगाळ वातावरण निवळले व पारा ३९ ते ४० अंशावर गेला असतांना मतदान केंद्रांवरील रांगा वाढल्याचे दिसून आले.
अमरावती लोकसभा मतदारसंघातंर्गत बडनेरा मतदारसंघात ४१.५२ टक्के अमरावती ४३.२९, तिवसा ३९.९६, दर्यापूर ४२, मेळघाट ४६.७५ व अचलपूर विधानसभा मतदारसंघात ४९.७० टक्के मतदान झाले आहे. दुपारनंतरही अनेक मतदान केंद्रांवर उन्हामध्ये रांगा होत्या, काही मतदारांनी सावलीचा आडोस घेतल्याचे दिसून आले. मतदारांच्या उत्साहाने निवडणूक विभागाचे नियोजन कोलमडले असले तरी कोणत्याही केंद्रांत गोंधळ किंवा यादीत नाव गायब असा प्रकार फारसा झालेला नाही.
पतीचा मृतदेह घरी असतानाही पत्नीने लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान केले. अचलपूर शहरातील महिराबपुरा येथील वासुदेवराव सावळे (६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी सुनंदा यांनी सकाळी जगदंब विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.