४० टक्के करवाढीला भाजपचा विरोध
By admin | Published: February 24, 2016 12:23 AM2016-02-24T00:23:40+5:302016-02-24T00:23:40+5:30
केंद्र व राज्यात भाजप सत्तेत असले तरी महापालिकेत ४० टक्के मालमत्ता करवाढ होऊ देणार नाही.
काँग्रेसवर आरोप : आमसभेत प्रस्ताव उधळून लावू
अमरावती : केंद्र व राज्यात भाजप सत्तेत असले तरी महापालिकेत ४० टक्के मालमत्ता करवाढ होऊ देणार नाही. त्याकरिता रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी असल्याचे भाजपचे गटनेते संजय अग्रवाल, माजी शहराध्यक्ष तुषार भारतीय यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
काँग्रेस, राष्ट्रवादी सत्ता पक्षाने सोयीचे राजकारण करण्यासाठी मंगळवारी होवू घातलेली आमसभा वेळेवर स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमिवर भाजपाचे सदस्य प्रसार माध्यमांशी बोलत होते. संजय अग्रवाल यांच्या मते ४० टक्के करवाढ रोखण्यासाठी भाजपचे सदस्य हे काळा पोषाख परिधान करून काँग्रेस, राष्ट्रवादीचा निषेध करणार होते. मात्र आमसभा स्थगितीमुळे भाजपला निषेध करता आला नाही. परंतु यानंतरच्या आमसभेत ४० टक्के करवाढ हाकलून लावू असा इशारा भाजपने दिला आहे. तुषार भारतीय यांनी महापालिका आमसभा ही जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्याचे व्यासपीठ असताना काँग्रेसने स्थायी समितीत सदस्य निवड करताना अंतर्गत वाद उफाळून येवू नये, या क्षुल्लक विषयासाठी आमसभा स्थगित केली, असा आरोप केलो. यावेळी गटनेता संजय अग्रवाल, तुषार भारतीय, अजय सामदेकर, चंदूमल बिल्दानी, छाया अंबाडकर, हेमलता साहू, कांचन उपाध्याय उपस्थित होते.