२२ सप्टेंबरला दिवस अन् रात्र समान; गोलार्ध पृथ्वीपासून समान अंतरावर राहणार

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: September 13, 2024 06:23 PM2024-09-13T18:23:27+5:302024-09-13T18:24:12+5:30

खगोलीय घटना : दोन्ही गोलार्ध पृथ्वीपासून समसमान अंतरावर

Day and night are equal on September 22; The hemispheres will be equidistant from the earth | २२ सप्टेंबरला दिवस अन् रात्र समान; गोलार्ध पृथ्वीपासून समान अंतरावर राहणार

Day and night are equal on September 22; The hemispheres will be equidistant from the earth

अमरावती : नेहमीच दिवस व रात्र यांचा कालावधी असमान असतो. मात्र २२ सप्टेंबरला हा कालावधी प्रत्येकी १२ तासांचा राहील. या दिवशी दोन्ही गोलार्ध पृथ्वीपासून समान अंतरावर राहणार असल्याचे खगोल तज्ज्ञांनी सांगितले.

पृथ्वीवर दर वर्षाला २१ मार्च व २२ सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्र प्रत्येकी १२ तासांचे म्हणजेच समान असतात. या विशेष तारखांना खगोल शास्त्रात विषुवदिन म्हणतात. इतर वेळी दिवस व रात्र नेहमीच लहान-मोठे असतात. दिवस व रात्रीची असमानता ही पृथ्वीच्या आसाच्या कलन्यामुळे निर्माण होते. पृथ्वीचा अक्ष हा २३.६ अंशाने कललेला आहे. जो गोलार्ध सूर्याकडे कलतो, त्या गोलार्धात दिवस १२ तासापेक्षा मोठा व रात्र १२ तासापेक्षा लहान असते.
जेव्हा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो, तेव्हा पृथ्वीवर दिवस व रात्र समान असतात. पृथ्वीच्या परांचल गतीमुळे या दिवसात थोडाफार फरक पडू शकत असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले. खगोलप्रेमींनी व भूगोलाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी २२ सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्रीचे प्रत्यक्ष काल मापन करावे व दिवसाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.

प्रकाशवृत्त उत्तर, दक्षिण ध्रुवातून जाणार
या दोन्ही दिवशी दोन्ही गोलार्ध पृथ्वीपासून समसमान अंतरावर असतात व प्रकाश वृत्त उत्तर, दक्षिण ध्रुवातून जाते. म्हणून २१ मार्च व २२ सप्टेंबरला दिवस व रात्र समसमान असतात. आकाशात वैषुविक व आयनिक वृत्तांचे दोन काल्पनिक छेदनबिंदू आहेत. त्यापैकी एकातून २१ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो त्याला वसंत संपात बिंदू म्हणतात तर त्याच्या विरुद्ध बिंदूत २२ सप्टेंबरला सूर्य प्रवेश करतो, त्याला शरद संपात बिंदू म्हणतात.

Web Title: Day and night are equal on September 22; The hemispheres will be equidistant from the earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.