शेतकरी अत्याचाराचा तो दिवस आजही स्मृतीत
By Admin | Published: September 5, 2015 12:22 AM2015-09-05T00:22:43+5:302015-09-05T00:22:43+5:30
शेतकऱ्यांना भीक नको हवे घामाचे दाम, असे ब्रिद वाक्य घेऊन सतत दोन दिवस चाललेल्या त्या शेतकरी ...
धामणगाव रेल्वे : शेतकऱ्यांना भीक नको हवे घामाचे दाम, असे ब्रिद वाक्य घेऊन सतत दोन दिवस चाललेल्या त्या शेतकरी अत्याचारांच्या आठवणींना आजही उजाळा मिळत आहे़ दोन शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्यानंतरही त्यावेळी न्याय मिळाला नाही. अखेर शेतकरी आंदोलन शेवटच्या टप्प्यातही यशस्वी ठरले नसल्याची खंत आजही वृध्द शेतकरी व्यक्त करतात़
धामणगाव तालुक्यात सन १९९७ मध्ये शेतकरी संघटनेचा मोठा प्रभाव होता़ शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शेतकरी संघटना ही व्याख्या पुढे येताच सर्वसामान्य शेतकरी कोणत्याही आंदोलनात सहभागी होत असे. उत्पादित शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी १२ ते १४ डिासेंबर १९९७ असे तीन दिवस शेतकऱ्यांनी आंदोलन छेडून शासनाविरुद्ध संघर्ष केला़ पाहिल्या दिवशी बोरगाव धांदे, देवगाव, उसळगव्हाण, तळेगाव दशासर, राजना, चांदूररेल्वे तर दुसरीकडे अंजनसिंंगी, कुऱ्हा, जुना धामणगाव या रस्त्यावर चक्काजाम करण्यात आला़ परंतु प्रशासनाच्या बेधुंद कारभारामुळे बळीराजाचा आवाज मुंबईच्या राजदरबारापर्यंत पोहोचू शकला नाही़ दुसऱ्या दिवशी चक्काजाम आंदोलन तीव्र करण्यात आले़ नागपूर, औरंगाबाद या राज्य मार्गावरील भातकुली रेणुकापूर हे गाव आंदोलनासाठी निश्चित करून व्यूहरचना आखण्यात आली़
तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी भातकुली या गावात पोहोचले ़ दुपारी १२ वाजता चक्काजाम आंदोलनाला सुरूवात झाली़ हजारो शेतकऱ्यांनी आपल्या बैलबंड्या रस्तावर उभ्या केल्यात़ दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाल्याने जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देण्यास सुरूवात केली़ परंतु शेतकऱ्यांनी अधिक आंदोलक पवित्रा घेतला़ मंगरूळ दस्तगीर, दत्तापूर, तळेगाव दशासर येथील पोलिसांनी लाठीमारास सुरूवात केली़ शेतकरी आंदोलनाला पोलीस प्रशासनानेच हिंसक वळण दिले़ हिरपूर येथील प्रमोद जवळकर व राजना येथील गणेश शिंदे हे दोन तरूण शेतकरी या आंदोलनात ठार झाले़ राज्य शासनापर्यंत हे वृत्त पोहोचले असले तरी दोन शेतकऱ्यांचा जीव या आंदोलनात गेला. आजही तालुक्यातील शेतकरी हिरपूर येथील प्रमोद जवळकर यांच्या मार्गावर जाऊन श्रध्दांजली वाहतात व आपल्या संवेदना व्यक्त करतात़