ईव्हीएममध्ये बिघाड, पाण्याची असुविधा, तरी मतदारांत उत्साह मोठा
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 26, 2024 18:12 IST2024-04-26T18:07:29+5:302024-04-26T18:12:04+5:30
Amravati : सायंकाळी ५ पर्यंत ५४.५० टक्के मतदान : निवडणूक विभागाचे नियोजन कोलमडले

Amravati Polling Booth
अमरावती : अमरावती जिल्ह्याचा २० वा खासदार निवडीसाठी यावेळी शहरासह गावागावांत उत्साह दिसून आला. काही केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाला तर कुठे पाण्याची असुविधा झाली. तरी मतदारांमध्ये उस्फूर्त उत्साह दिसून आला. अंगाची काहिली करणारे उन्ह राहणार असल्याने निवडणूक विभागाने मंडपाची व्यवस्था केली असली तरी मतदारांच्या उत्साहाने ऐनवेळी अनेक केंद्रांवर नियोजन कोलमडल्याचे दिसून आले.
अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार २६ एप्रिल रोजी सकाळी ७ पासून मतदानाची प्रक्रिया सुरु झाली. जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी सुरु आहे. त्यातच गुरुवारी रात्री सार्वत्रिक पाऊस झाल्याने सकाळपासूनच वातावरणात थंडावा होता, त्यामुळे बहुतांश नागरिकांची पावले मतदान केंद्रांकडे वळली. शिवाय शहरासह ग्रामीण भागात तसेच मुस्लिमबहुल परिसरातील केंद्रांवर एकच गर्दी झाल्याचे चित्र मतदान केंद्रांवर दिसून आले. मतदारांचा ओघ दुपारनंतरही कायम होता. त्यामुळे मतदानाचा टक्का यावेळी वाढला आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघातंर्गत सायंकाळी ५ पर्यंत ५४.५० टक्के मतदान झाले. यामध्ये बडनेरा मतदारसंघात ५०.९४ टक्के अमरावती ५४.६१, तिवसा ५२.७१, दर्यापूर ५३, मेळघाट ५५.२० व अचलपूर विधानसभा मतदारसंघात ६१.३३ टक्के मतदान झाले आहे. दुपारनंतरही अनेक मतदान केंद्रांवर उन्हामध्ये रांगा होत्या, काही मतदारांनी सावलीचा आडोस घेतल्याचे दिसून आले.