‘बारूद गँग’चा बालेकिल्ला होणार उद्ध्वस्त!
By admin | Published: September 6, 2015 12:00 AM2015-09-06T00:00:55+5:302015-09-06T00:00:55+5:30
जुळ्या नगरीत हैदोस घालणाऱ्या कुख्यात ‘बारूद गँग’च्या कुकृत्यांचा बालेकिल्ल्ला असलेल्या येथील चौधरी चौकातील अतिक्रमण हटविण्याची तयारी
चौधरी चौकातील अतिक्रमण काढणार : १७ दुकानदारांना बजावल्या नोेटिसी
अमरावती / अचलपूर : जुळ्या नगरीत हैदोस घालणाऱ्या कुख्यात ‘बारूद गँग’च्या कुकृत्यांचा बालेकिल्ल्ला असलेल्या येथील चौधरी चौकातील अतिक्रमण हटविण्याची तयारी आता पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. येथील १७ अतिक्रमितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
१५ दिवसांत दुकानदारांनी अतिक्रमण न काढल्यास पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे ते उद्ध्वस्त केले जाईल, असा इशारा नोटीसीतून पालिका मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे. रेती तस्करीच्या वादातून ‘बारूद गँग’ने अमित बटाऊवाले नामक निर्दोष तरूणाची हत्या केली. त्याचे तीव्र पडसाद उमटले. याप्रकरणी दोषी आढळलेल्या पोलिसांच्या बदल्या झाल्यात. रेती तस्करांना पाठीशी घालणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात ‘लोकमत’ने निर्भीड लिखाण करून ‘बारूद गँग’चे अक्षरश: वाभाडे काढले. परिणामी प्रशासनाला जाग आली. आता कारवाईच्या याच श्रुंखलेत ‘बारूद गँग’चा ठिय्या असलेल्या येथील चौधरी चौकातील अतिक्रमण हटविले जाणार आहे. येथूनच ‘बारूद गँग’चे अवैध धंदे संचालित होत असल्याने पालिकेद्वारे केली जाणारी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
अचलपूर उपजिल्हा रूग्णालयाजवळ चहा टपऱ्या, पान टपऱ्या, कँटीन आहेत. अतिक्रमित जागेवरच हे व्यवसाय चालविले जातात. या व्यवसायामुळे बऱ्यापैकी रोजगार मिळाला आहे. परंतु बारूद गँगचे गैरव्यवहारही येथूनच चालतात, हेदेखील तेवढेच खरे आहे.
‘बारूद गँग’च्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन राहात होते. आता मात्र, हे अतिक्रमण हटविले जाणार असल्याने जुळी नगरी नक्कीच मोकळा श्वास घेईल.
हे आहेत अतिक्रमणधारक
सै.फईम सै.बिस्मिल्ला, दिलीप बिजवे, सलिमखाँ हमिदखाँ, सै.रउफ सै.बिस्मिल्ला, सै. अली मुमताज अली, अजहरअली जामिनअली, नरेश टापरे, सुलतान खाँ घुडेखाँ, शे. नजीर शे. अन्नू, सै.मुख्तार सै.मुमताज, शे. वजीर शे.बुरू, शे.हसन रज्जाक, शे.मोबीन शे. बब्बू, इरफान खाँ, वहिदभाई, शे. महेमूद आदींचा अतिक्रमणधारकांच्या यादीत समावेश आहे. या अतिक्रमणधारकांना महाराष्ट्र नगर परिषद कायदा १९६५ कलम १८१ व १८९ (८) नुसार नोटीस बजावण्यात आली आहे.