जिल्ह्यात सुरक्षितता कितपत ? वर्षभरात बलात्कार विनयभंगाचे ३८३ एफआयआर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:09 IST2024-12-19T11:00:09+5:302024-12-19T11:09:34+5:30
शाळकरी मुली लक्ष्य : वर्षभरातील अपहरण, अत्याचार उघडकीस

How safe is the district? 383 FIRs of rape and molestation in a year
प्रदीप भाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहर असो वा जिल्ह्याचा ग्रामीण भाग, अल्पवयीन मुली तथा कॉलेजवयीन मुलींचा पाठलाग, विनयभंग व अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शहर वा जिल्ह्यात मुली, महिला किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न समाजाला भेडसावू लागला आहे. कौटुंबिक कलहदेखील पोलिस ठाण्यात पोहोचत आहेत. सोबतच काही अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यासह त्यांच्यावर अकाली मातृत्व लादल्याच्या घटनादेखील उघड झाल्या आहेत. सोशल मीडियाचा अतिवापर कॉलेजवयीन मुलींच्या पाठलागास, विनयभंगास, बलात्कारास कारणीभूत ठरत आहे.
चार महिन्यांपूर्वी शिरखेड व तिवसा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नांमुळे शाळकरी मुली नराधमांचे सॉफ्ट टार्गेट ठरत असल्याचे चित्र आहे. यंदाच्या पहिल्या ११ महिन्यांत बलात्कारातून १५ पेक्षा अधिक अल्पवयीन मुलींवर अकाली गर्भारपण लादण्यात आले. सोशल मीडियातून झालेली ओळख, त्यातून त्या अनोळखी व्यक्तीप्रति निर्माण झालेले आकर्षण तसेच लग्नाच्या आमिषापोटी अनेक मुलींना शारीरिक अत्याचाराला, अपहरणाला सामोरे जावे लागत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास
गेल्या दीड वर्षांत घडलेल्या सायबर गुन्ह्यांमध्ये सोशल मीडियावरून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण १६ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फेसबूकवरून होणाऱ्या गुन्ह्यांच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. सोशल मीडियावरील वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. सोशल मीडियावरून वेगवेगळ्या पद्धतीने तरुणींना त्रास दिल्याबाबतचे अर्ज सायबर सेलकडे येत आहेत. या अर्जाचा तपास केल्यानंतर या गुन्ह्यांमधील आरोपी पीडित तरुणीच्या ओळखीचे किंवा जवळचे असल्याचे दिसून येते.
बलात्कार, विनयभंगाचे ३८३ गुन्हे
ग्रामीण जिल्ह्यात यंदाच्या जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान महिलांवरील अत्याचार व विनयभंग असे एकूण ३८३ गुन्हे नोंदविण्यात आले. सर्व गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला. यंदा अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाचे एकूण २०२ गुन्हे नोंदविण्यात आले. पैकी १७४ मुला-मुलींचा शोध घेण्यात आला आहे. यंदाच्या ११ महिन्यांत बलात्काराचे ११७, तर विनयभंगाचे २६६ गुन्हे नोंदविण्यात आले.
गतवर्षीच्या ११ महिन्यांत अशी झाली गुन्ह्यांची नोंद
सन २०२३ च्या जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान महिला अत्याचाराचे १०४, तर विनयभंगाबाबत २८१ एफआयआर नोंदविले. विनयभंगाची एक घटना वगळता ३८४ एफआयआरमधील सर्व आरोपींना अटक करण्यात आली.
"विनयभंग, छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी दामिनी पथके, महिला पथकेदेखील कार्यान्वित करण्यात आली आहेत. धरण व निर्जनस्थळी गस्तदेखील वाढविण्यात आली आहे. असे गुन्हे तातडीने दाखल करून तपास केला जातो."
- किरण वानखडे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा