पथकांद्वारा सोयाबीनची पाहणी
By admin | Published: September 8, 2015 12:03 AM2015-09-08T00:03:23+5:302015-09-08T00:03:23+5:30
धुक्याच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील काही भागात सोयाबीन मलूल पडत असल्याने कृषी अनुसंधानकेंद्राच्या ...
नमुने तपासणी : पथकात शास्त्रज्ञ, कृषी अधिकाऱ्यांचा समावेश
अमरावती : धुक्याच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील काही भागात सोयाबीन मलूल पडत असल्याने कृषी अनुसंधानकेंद्राच्या शास्त्रज्ञांसह कृषी अधिकाऱ्यांच्या तीन पथकांनी सोमवारी तिवसा, कुऱ्हा व अंजनगाव बारी येथील सोयाबीन पिकांची पाहणी केली. याबाबतचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते.
या वृत्ताची दखल घेऊन अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी बाधित झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दोन दिवसांपासून काही भागातील सोयाबीन मलुल पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये याविषयी संभ्रम निर्माण झाला होता.
पाहणी अहवाल होणार सादर
अमरावती : अमरावती तालुक्यामधील अंजनगाव बारी येथील सोयाबीन पिकांची तालुका कृषी अधिकारी लाड, मंडळ अधिकारी व कृषी अनुसंधान केंद्र घातखेड्याचे शास्त्रज्ञ मेंढे व कृषी अनुसंधान केंद,्र दुर्गापूर येथील शास्त्रज्ञ सिंग व जायले यांनी पाहणी केली. याठिकाणी सोयाबीनवर खोडअळी, कीड तसेच पावसाची दडी याचा एकत्रित परिणाम झाल्याने सोयाबीन मलूल पडत असल्याचे त्यांनी सांगितले.
तिवसा तालुक्यामधील विक्रांत वानखडे यांच्या सोयाबीनच्या शेताची प्रादेशिक संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ मुंजे व चंदनकर तसेच मंडळ कृषी अधिकारी अनंत मस्करे यांनी पाहणी केली. याठिकाणी ‘कॉम्प्लेक्स’ स्थिती सोबतच दाट धुक्याच्या परिणामाची शक्यता देखील त्यांनी वर्तविली. येथील सोयाबीन रोपाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. कुऱ्हा येथे सुरेश मुंदडा यांच्या शेतात मंडळ कृषी अधिकारी आर.डी.पाटील व पर्यवेक्षक पी.एन. भारसाकळे यांनी पाहणी करून सोयाबीन रोपाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. (प्रतिनिधी)
‘कॉम्प्लेक्स’ स्थितीचा परिणाम
अमरावती तालुका कृषी अधिकाऱ्यांसह घातखेडा व दुर्गापूर येथील शास्त्रज्ञांनी अंजनगाव बारी, भानखेड येथील सोयाबीन पिकांची पाहणी केली. याठिकाणी धुक्याचा नव्हे तर पावसाचा ताण, किडींचा प्रादुर्भाव, मोझॅकचा परिणाम सोयाबीनवर होत आहे. यामुळे उत्पन्नात सरासरी ३० टक्क्यांनी घट येऊ शकते. यासाठी करावयाच्या व्यवस्थापनाचा अहवाल दिल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी अनिल खर्चान यांनी सांगितले.
अमरावती तालुक्यात कृषी अधिकारी व शास्त्रज्ञांनी सोयाबीनची पाहणी केली त्यांच्याशी चर्चा केली असता पावसाचा खंड, वाढलेले उष्णतामान, खोड किडीमुळे कॉम्प्लेक्स स्थिती निर्माण होऊन सोयाबीन मलूल पडत आहे.
- दत्तात्रेय मुळे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी