विशेष सभेत कल्लोळ
By admin | Published: February 24, 2016 12:14 AM2016-02-24T00:14:02+5:302016-02-24T00:14:02+5:30
जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या पाणी टंचाई कृती आराखड्यात आवश्यक असलेल्या गावांना डच्चू देत दुसऱ्याच गावांचा समावेश करण्यात आल्याची बाब उघडकीस आली.
जिल्हा परिषद : पाणीटंचाईविषयी सदस्य आक्रमक
अमरावती : जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या पाणी टंचाई कृती आराखड्यात आवश्यक असलेल्या गावांना डच्चू देत दुसऱ्याच गावांचा समावेश करण्यात आल्याची बाब उघडकीस आली. पाणी टंचाई विषयावर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात विशेष सभा बोलविण्यात आली होती. यावेळी सदस्यांनी प्रशासनाची पोलखोल केली. दरम्यान सभागृहात चांगलाच कल्लोळ उठला होता.
जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने मोठा गाजावाजा करीत दोन महिन्यापूर्वी पानी टंचाईचा आराखडा तयार केला. मात्र यंदाच्या आराखड्यात टंचाईच्या तिव्रतेचा अंदाज अधिकाऱ्यांना समजलाच नाही. कृती आराखड्यात समाविष्ट गावांमध्ये पाणीटंचाईच्या उपाययोजना करण्यात आल्या असल्यातरी ज्या गावांना पाणी टंचाईचा सामना सध्या करावा लागत आहे त्या गावांचा यात समावेश नसल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे,, सुधीर सूर्यवंशी, अभिजित ढेपे, चंद्रपाल तुरकाने, मनोहर सुने, जया बुंदिले, विनोद टेकाडे, संगिता चक्रे, मंदा गवई, संगीता सवाई वनमाला खडके आदी सदस्यांनी प्रशासनाला कोंडीत पकडत जाब विचारला. नियोजन आराखडाच चुकीचा असल्याचा आरोप सुरेखा ठाकरे यांनी सभेच्या प्रारंभीच केला. सभेची कुठलीही तयारी प्रशासनाने केली नाही. सदस्यांना ज्या अपेक्षा विशेष सभेत पाणीटंचाईबाबत कुठलाही समावेश व नियोजन न केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी चंद्रपाल तुरकाने यांनी तिवसा तालुक्यात अद्यापही ५० टक्के गावे आहेत. सार्सी, कुऱ्हा आदी गावांना आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा होत असल्याची पदाधिकाऱ्यांची ओरड होती. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हिरापूर या गावात दोन कूपनलिकेव्दारे पाणीपुरवठा होतो. मात्र यापैकी एक कूपनलिका बंद आहे. त्यामुळे या गावात कुत्रिम पाणीटंचाई भासत आहे. याबाबत येथील सरपंच मीनल दखने यांनी अनेक वेळा पंचायत समितीकडे तक्रार केली. याची दखल घेत पाणी टंचाईचे सभेत सभापती विनोद टेकाडे, जि.प. सदस्य सुधीर सूर्यवंशी यांनी या गावांचा समावेश कृती आराखड्यात करावा, अशी मागणी सभागृहात केली. ही मागणी मान्य करून उपाययोजना करण्याचे आदेश सीईओंनी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान पाणी टंचाईच्या विषयावर वादळी चर्चा सुरू असताना जि.प. सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती यांनी आपापल्या मतदारसंघातील पाणीटंचाईचे विषय, बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना, नादुरूस्त कूपनलिका आदी प्रश्नांवरही पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. ज्या गावांना खऱ्या अर्थाने पाणी टंचाईची झळ बसत आहेत अशा सर्व गावांचा समावेश कृती आराखडयात करण्यात यावा, पिण्यायोग्य पाणी नाही अशा गावातही शुध्द पाणीपुरवठा करण्याची मागणी सदस्यांनी रेटून धरली असता यावर जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी तातडीने उपायायोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यावेळी सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, सीईओ सुनील पाटील, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के.टी. उमाळकर व अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)